"हिंदुस्थानच्या सीमेवर आपले सैनिक अहोरात्र
डोळ्यात तेल घालून पहारा देतात म्हणूनच आपण येथे सुखाने झोपू शकतो. हिवाळ्यातल्या
थंडीने आपल्या अंगात कापरे भरते, मग महिनोन महिने सीमेवरच्या बर्फात पहारा देणाऱ्या
सैनिकांचे काय हाल होत असतील. त्याशिवाय पाकिस्तानी सैनिक आणि त्यांनी पोसलेले
अतिरेकी यांच्या कचाट्यात सापडलेल्यांचे काय होते त्याचा हिशोब कुणाकडे नसतो. हिंदुस्थानसाठी
लढणाऱ्या, आपले कर्तव्य
बजावणाऱ्या सैनिकांसाठी, त्यांच्या
कार्यासाठी सलाम! एक करा, जर त्यांच्याबद्दल
तुम्हांला आदर दाखवायचा नसेल तर निदान त्यांच्याकडे संशयाचे बोट दाखवू नका...
विचार करा"
भाग-१ इथे वाचा ...
मुंबईला येण्यासाठी एक्स्प्रेसमध्ये बसलो तरी. ते दृश्य डोळ्यासमोर तरळत होते. त्या बाळाचा अकाली प्रौढ
झाल्यासारखा चेहरा सारखा समोर येत होता. पण याला छेद देणारे जीवनाचे दुसरे रूप
समोर आले ते एका म्हातार बाबाच्या रूपानं.
माझा प्राध्यापक मित्र तसा गोष्टीवेल्हाळ, बाजूला बसलेल्या दोन भैयांची मस्त फिरकी ताणत
आमचा प्रवास चाललेल "अगर आप दिल्ली में मिले होते, तो आपका कौनसा भी काम फोन पर ही कर देते" या त्यांच्या बढाईवर "जब आप कभी मुंबई मे
आयेंगे तो फोन करना, हम मुंबई के मशहूर
पत्रकार हैं"(त्यावेळी माझं पाक्षिक नुकतंच चालू झाल्यामुळे मी पत्रकार असल्याचे
सगळ्यांना ठणकावून सांगत असे) अशी कडीवर कडी करीत, प्रवासाची मजा लुटीत आमचा वेळ चालला होता.
मध्येच कुठलंतरी स्टेशन आलं आणि एक पोरगेलासा
दिसेल असा तीसेक वर्षाचा तरुण गाडीत चढला आणि त्याचीही फिरकी घेण्याची आम्हांला
लहर आली.
"कुठे चाललास"
"प्रथम मुंबईला, तेथून मद्रासला जाणार."
"काम काय करतोस?"
"सैन्यात आहे, काश्मीर खोऱ्यात-पंधरा दिवसांची सुट्टी मिळाली जरा घुमके आता हूँ" साध्या सैनिकाला
प्रश्न काय विचारायचे म्हणून आम्ही गप्प बसलो तर तो आमच्यापेक्षा गोष्टीवेल्हाळ
निघाला. बोलता बोलता त्याने आमची सर्व माहीती काढून घेतली. तोपर्यंत खूप रात्र
झाली होती. झोपी गेलो.
सकाळी उठून ताजेतवाने झाल्यावर गप्पा मारताना
काश्मीरचा उल्लेख होणे अपरिहार्यच होते.त्याला खूपच माहिती होती. काश्मिरात नुकताच
घडलेला बॉम्बस्फोट ज्याचे वृत्त कुठल्याच वृत्तपत्रात आले नाही. या स्फोटात मेजर
जनरलसह पाच अधिकारी मारले गेले होते. अतिरेक्यांचे शरण नाट्य, भारत पाकिस्तानचे राजकीय नाट्य, बर्फात 'बंदे'(जवान)चे होणारे हाल, गोळी कुठून येईल आणि शरीराला छेदून जाईल याचा भरवंसा नाही. त्याशिवाय अतिरेकी/पाकिस्तानी सैन्याच्या हाती सापडल्यावर
त्यांच्याकडून होणाऱ्या अमानुष हत्या (उदा.चमच्याने डोळे काढणे,नखे ओढून काढणे, एक एक बोट तोडून टाकणे.इत्यादी, जे सामान्य लोकांना केव्हाच समजत नाही) मुंबईत
तीन रुपये लिटरने मिळणारे रॉकेल बर्फावरील छावणीत पोहचेपर्यत रुपये तीनशे रुपये
लिटर होते याच्या आकडेवारीतून दर दिवशी संरक्षणविषयी केंद्र शासनाचा होणारा खर्च
किती अफाट होतो याची तो माहिती आम्हाला देत होता, अधिकारवाणीने बोलत होता. अर्थात येथे ही गोष्ट
खूप वर्षांपूर्वीची आहे, हे लक्षात घेणे
आवश्यक आहे. सध्या मुंबईत रॉकेल ४०रुपये लिटर आहे. तो तरुण असलिखित इंग्रजीत भारत
पाक संबंधांबद्दल आणि पाकिस्तानच्या घुसखोरीबद्दल अधिकारवाणीने बोलत होता. त्याची
मते स्पष्ट होती. जर राजकारण्यांनी राजकारण केले नाही आणि लष्कराचा निर्णय ग्राह्य
धरला तर काश्मीर प्रश्न काही दिवसांत सुटू शकतो. कारण काश्मीर सर्वसामान्य जनतेला
होणारी दुहेरी जाचातून सुटका हवी आहे. मग राज्य कुणाचेही येवो. काश्मिरी जनतेला
कसा त्रास होतो आणि कुंपणच शेत कसे खाते याचे एक उत्तम उदाहरण त्याने दिले.
रात्री अपरात्री अतिरेकी तोंडावर फडका बांधून
येतात आणि धमकावतात. 'अमुक एक रक्कम द्या, नाहीतर गोळ्या घालतो. कुटुंब घाबरून रक्कम देते. सकाळी हेच
अतिरेकी पोलीस बनून येतात आणि धमकावतात" रात्री तुमच्याकडे अतिरेकी आले होते
आम्हांला पक्की खबर आहे. चला आत" आणि मग त्यांच्याकडून आणखी रक्कम वसूल करून
त्यांना सोडून दिल्याचे नाटक केले जाते. जे अतिरेकी करतात तेच पोलिसही करतात.
आपल्या तीन बंद्यांना अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या तेव्हा चिडून आपल्या जवानांनी
दहा अतिरेक्यांनी कसं टिपलं हे सांगताना त्याचा चेहरा अभिमानाने फुलला होता. तर
ऐशी कॉलेज कन्यकांवर पाशवी बलात्कार करून अखेरीस लष्कर मागे लागल्यावर शरण आलेल्या
अतिरेक्याला कोणतीही दयामाया न दाखविता त्याच्या मस्तकावर गोळ्या झाडल्या हे ही
त्याने सांगितले. अतिरेक्याला असे मारण्यामागे त्याचे कारण तसे संयुक्तिक होते.
शरण आलेल्या अतिरेक्याने ऐशी तरुणींना आयुष्यातून उठविले होते. त्याला पकडून
तुरुंगात टाकले असते तर कोणी सांगावं एखाद्या नेत्याला त्याचा पुळका यायचा आणि
त्याने त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करायचा. आम्ही शंभर दिवस खपून यशस्वी व्हायचं
आणि त्याने एका दिवसांत त्यावर बोळा फिरवायचा-हेच त्याचे दु:ख होते.
आम्ही हे सगळे त्याच्या तोंडून ऐकताना मनात एकच
प्रश्न होता. एका साध्या जवानाला एवढे अधिकार असतात काय? त्याचे उत्तरही लगेच मिळाले, आम्ही ज्याला साधा सैनिक समजत होतो तो शीख
रेजिमेंटचा मेजर होता. आयत्या वेळी मिलिटरीच्या स्पेशल डब्याचे
रिझर्वेशन मिळाले नाही म्हणून आमच्या डब्यातील रिझर्वेशन
त्याने घेतले होते.
एवढ्या तरुण वयात मेजर हे आमच्या दृष्टीने
आश्चर्यकारक होते. पण त्याचे ओळखपत्र पाहून खात्री पटली आणि अरे-तुरे वरून आमची
संबोधने आदरार्थी झाली. आणि ते त्याच्याही लक्षात आले. "नही दोस्त, दोस्ती मे ताल्लुकात की क्या बात है, मै तो दोस्त हूँ आपका, दोस्त, आपके लिए सिर्फ दोस्त! आम्हांलाही त्याच्या दोस्तान्याची
ओळख पटली. एक कथित पत्रकार, एक प्राध्यापक आणि
एक मेजर. तिघांच्या गप्पात वेळचे भान कुणालाच राहिले नाही.
गाडी कुठल्या तरी स्टेशनात थांबली. पोटात भूक
होती म्हणून खाली जाऊन तिघांसाठी खाणे आणले. आमच्या पिशवीत शेव चिवडा होता. तो ही बाहेर काढला. आम्ही तिघेजण त्यावर तुटून पडलो. गाडी सुटता
सुटता आमच्या रिझर्वेशन डब्याच्या मोकळ्या जागेत एक म्हातारा येऊन बसला.
हातापायाच्या काड्या, मळकट धोतर, फाटके शर्ट, हातात काठी, तिथे बसता बसता तो आडवाच झाला. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे
डब्यात उष्ण हवा होती. डबा बहुतांशी रिकामा होता. त्यामुळे आमच्या मेजर मित्राने
दया त्याला येऊन सीटवर बसायला सांगितले. तो बाजूच्याच सीटवर संकोचून बसला.
मी आमच्या पुढ्यातील थोडे पदार्थ घेतले आणि
मेजरच्या आग्रहावरून त्या म्हाताऱ्याला देवू लागलो. पण तो म्हातारा काही घेईना, अधिक आग्रह केला तेव्हा त्यानं घेतला, थोडं खाल्यासारखं केलं आणि पुरचूंडी बांधून
ठेवली आणि आपल्या मोडक्या तोडक्या हिंदीत तो सांगू लागला, "माझ्या घरी माझी वाट पाहणारं एक लेकरू आहे
आईबापाविना", त्याच्या
सांगण्यानुसार त्याची एकुलती एक लेक म्हाताऱ्याच्या पदरात एक पोरं टाकून निघून गेली, पाठोपाठ जावयाचे राम म्हटला, आणि म्हाताऱ्याबरोबर लेकराच्या वाटेला दुःख आलं, म्हाताऱ्याने रानातल्या काटक्या लाकडे विकून
दोघांच्या उदरनिर्वाह चालविला. पण म्हाताऱ्याच्या वयोमानानुसार आता तेही काम जमत
नाही. आणि म्हातारा फक्कन रडला, "भीक मागतो स्टेशनवर, माझं काय लाकडं गेली मसणात, पण माझ्या लेकराचं काय होणार? त्याच्यासाठी जीव तीळ तीळ तुटतो माझा"
म्हाताऱ्याने डोळे पुसले, आमचा मेजरही मित्र आतून हेलावला, दुसऱ्या स्टेशनात गाडी शिरता शिरता म्हातारा
काठी टेकीत उठला आणि लगबगीने खाली उतरू लागला, एक सेकंद आमच्या तिघांच्या नजरा एक झाल्या आणि प्रत्येकाने खिशात हात घातला. तिघांनीही
हात बाहेर काढले तेव्हा पन्नासेक रुपये झाले. क्षणार्धात मेजर उठला आणि घाईघाईने
खाली उतरून ती रक्कम म्हाताऱ्याच्या हातात कोंबली. प्लॅटफॉर्मवरून म्हातारा
दिड:मुख होवून तसाच हातात पैसे धरून उभा होता आणि गाडी हालली, पिकल्या दाढीतून दोन असावं ओघळली, म्हाताऱ्याने हात जोडले, आम्हाला तो आशीर्वादच वाटला. आम्ही फक्त एवढंच करू शकत होतो.
-समाप्त-
-भिवा रामचंद्र परब
No comments:
Post a Comment