विज्ञान आणि आध्यात्म या नाण्याच्या दोन बाजू आहे. परमेश्वराने पसरून
ठेवलेल्या या विश्वाच्या पसाऱ्याचा मनुष्य जेव्हा धांदोळा घेण्याच्या प्रयत्न करतो
तेव्हा त्याला काही ना काहीतरी गवसते. प्रत्येकाची
सांगण्याची पद्धत वेगळी, गृहीतके मांडण्याची पद्धत वेगळी पण शेवटी सगळे येऊन मिळते ते विश्वाच्या
उगमापाशी... अध्यात्मापाशी... खरं तर विज्ञान हे आध्यात्मावरच आधारलेले आहे, पोसलेले आहे. पंचतत्वाच्या एकत्रित विचार म्हणजेच आध्यात्म आणि
आध्यात्माचा सूक्ष्मातला सूक्ष्म अभ्यास म्हणजे विज्ञान. विज्ञान प्रत्यक्ष कृती
करून सूक्ष्मातल्या सूक्ष्माचे विघटन करून एक एक शोध लावते. आपण नवीन नांवाने
त्याचे गुणगाण गातो. थोडक्यात सांगायचे झाले तर, परमेश्वरानं
मांडून ठेवलेल्या विश्वाच्या पसाऱ्याचा केवळ अर्थ लावण्याचे काम विज्ञान करते. देव
हे सत्य आहे, असे क्षणभर मानले तर या अंतिम सत्याचा शोध
घेण्याचं काम विज्ञान करते असे म्हणावयास काहीही प्रत्यवाह नसावा. याच
आध्यात्माच्या मुशीतून तयार झालेले रूढी, परंपरा
यांच्या नव्याने धांदोळा घेण्याचा प्रयत्न जो तो अभ्यासू आपापल्या परीने घेत असतो.
यज्ञ ही एक अशीच रूढी, परंपरा.
याचाच मागोवा घेण्याचा प्रयत्न प.पु.सदगुरु श्री वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी
आपल्या 'यज्ञरहस्य' या
पुस्तकातून केला आहे. यज्ञ साधनेमागील संपूर्ण तत्वज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत
पोहचावे आणि त्याद्वारे यज्ञ संकल्पनेचा प्रचार व प्रसार व्हावा या उदिष्टाने श्री बापट गुरुजीने लेखाद्वारे मांडलेले विचार या पुस्तकातून संग्रहित
केले आहेत. आज यज्ञाची संकल्पना थोडीशी कालबाह्य झाली आहे, सगळीकडे उदासीनता आली आहे. यज्ञमार्गाला कर्मकांड कसे दूषण देऊन त्याकडे
पहाण्याची समाजाची दृष्टीही दूषित झाली आहे अश्या परिस्थितीत एक प्रकारे यज्ञ या
संकल्पनेच्या पुनरुज्जीवनाचा ध्यास बापट गुरुजीनी घेतलेला आहे, या यज्ञाचे विज्ञानाशी असलेले
नाते त्यांनी अतिशय सुंदरपणे उलगडून दाखविलेले आहे. यज्ञ : व्याख्या आणि संकल्पना, यज्ञशक्ती आणि आधुनिक विज्ञान, समगती आणि
एकाग्रता, यज्ञ : एक सत्संकल्प अशा पाच प्रकरणातून
त्यांनी यज्ञासंबंधी विवेचन केले आहे. सनातन वैदिक धर्मात सांगितलेले यज्ञविचार
आजच्या आधुनिक काळातही कसा योग्य आहे ते त्यांनी अनेक उदाहरणांनी दाखवून दिले आहे.
सद्हेतुपुर्वक निर्माण केलेला प्रकाश, सद्हेतुपुर्वक
निर्मण केलेली गती आणि आत्मिक ज्ञानाची निर्मिती करणारा, यज्ञाच्या अशा सोप्या व सुटसुटीत तीन व्याख्या त्यांनी केलेल्या आहेत.
कुठलाही अग्नी पेटविला म्हणजे तो यज्ञ होत नाही, तर
वैश्विक कल्याण, समाजाचे कल्याण आणि आत्मोद्वार या
श्रेष्ठ हेतूची जोडणी जेव्हा प्रकाशाला गतीला दिली जाते तेव्हाच तीच यज्ञाची
संकल्पना ठरते असे ते म्हणतात. मनाची अत्युच्च्य पातळी गाठल्याशिवाय ईश्वरी
तत्वाचे ज्ञान होत नाही. त्यासाठी यज्ञ साधना हा एक प्रभावी उपाय आहे. यज्ञाची
विज्ञानाशी सांगड घालताना अणू परमाणूंचे स्व मन, आणि
क्वांटम विज्ञानातला बुचकळ्यात पाडणारा सिद्धांत म्हणजे इ.पी.आर.चा परस्परविरोध
यांचे सुंदर विवेचन त्यांनी केलेले आहे. काही ठिकाणी त्यांनी पाश्चात्य लेखकांच्या पुस्तकांचा आधार घेतलेला आहे. समजायला सोपे जावे म्हणून त्यांनी काही
ठिकाणी आकृत्यांची रेखाटने केलेली आहेत. प.पु.बापट गुरूजींचे हे यज्ञविषयीचे हे
विचार कुणाही पटतील असेच आहेत. पौराणिक काळातील रूढी परंपरा यांच्या जसा
वेगवेगळ्या प्रकारे साकल्याने अभ्यास होईल तसे त्यातून अशा प्रकारचे
विज्ञानाधिष्ठीत असे विचार पुढे येतील याबद्दल दुमत नाही.
पुस्तकाचे नांव : यज्ञरहस्य
लेखक : प.पु. सदगुरु श्री वासुदेव वामन बापट गुरूजी
प्रकाशक : यज्ञेश्वर प्रकाशन, कल्याण
पृष्ठे : ८८ देणगीमुल्य ; रु १५०/-
-भिवा रामचंद्र परब
No comments:
Post a Comment