गावांतील 'जाणतो' हे
मोठे प्रस्थ. वर्षानुवर्षे कुणाच्या घरातल्या बारश्यापासून ते मयतापर्यत त्याचा
शब्द अखेरचा. अज्ञानी गाव सदा त्याच्या दावणीला
बांधलेला..असा हा जाणता निवडणुकी संबंधीची ती बातमी ऐकल्यापासून थोडासा सैरभैर
झाला होता. त्याने आवाटातील सर्वाना आपल्या घरी बोलाविले.
"या सरकाराक काय झाला ताच
कळना नाय. म्हणे महिला आरक्षण! अरे गरामपंचायतीचो काय मासळी बाजार करुचो आसा? जर गावचो विकास जर अशा मासळी बाजारातून व्हयत, असा
जर सरकारक वाटात आसात तर ता चूक आसा.. ह्या सरकारांक कोणी तरी सांगाक व्हया" व्हरांड्यात येरझाऱ्या घालीत जाणतो
तावातावाने बोलत होतो आणि जमलेली आवाटातली पाच पंचवीस डोकी खाली मान घालून गप्प
होती. त्यांना जाणतो काय बोलतो तेच कळत नव्हते. जाणतो पुढे बोलू लागला.
"आता गरामपंचायतीचे
निवडणुका ईलेहत आणि आपलो विभाग बायल माणसांसाठी राखीव
झालो. "ज्यांनी कधी बघलो नाय आवो, ती रे काय लायतली दिवो" चूल आणि मुल संभाळूक ज्यांची उभी हयात गेली ती बायल माणसां उभी ऱ्हवान काय
करतली? अडाणी खंयची! ही गावचो विकास काय करतली?अरे,असे निवडणुकी इले कितके आणि गेले कितके, पुन ह्यो जाणतो सांगात तोच उमेदवार...आजपर्यत कितक्यांका मिया पाठींबो
देवन निवडून हाडलंय, त्येचो पत्तो नाय. निवडणुकीक
खंयच्याय पक्षाचो उमेदवार उभो ऱ्हावांदे, ह्या
जाणत्याचो आशीर्वाद घेतल्याशिवाय तो निवडून येवचो नाय. ह्या त्या उमेदवाराकय
माहिती आणि विरुद्ध पार्टीकय माहिती. उमेदवार पाडूचो आसलो तरी माझीच मदत...माझ्या
मते हीच खरी लोकशाही. ह्यो आपलो तो तुपलो असो
भेदभाव माझ्याकडे नाय.आणि ह्या सगळ्यांका सांगान हां. उगाच आपला ताकाक जावन भांडा
कित्याक लपया?" आता कुठं जमलेल्यांच्या डोक्यात
प्रकाश पडला. अस्सा मामला आहे तर! निवडणूक इली.
"दादा, ह्या सगळा आमकां माहिती आसा,पुन्हा पुन्हा खंय
उगाळीत बसल्यास? तुमच्याशिवाय ग्रांमपंचायतीचो योक कागद
सुद्धा हडसून तडे हालना नाय" सखारामाने मान वर
केली. जाणत्याने त्याच्याकडे रोखून पाहिले.हा खरंच मनापासून बोलतो की वरवर? त्याला अंदाज येईना. तरी सुद्धा त्याने आपले बोलणे चालू ठेवले.
"सगळो गाव माका जाणतो
म्हणान ओळखता. मी म्हणान ती पूर्व दिशा...पण निवडणुकीच्या या नव्या फतव्यानं माका
काळजीत टाकल्यानं. काय करुचा काय्येक सुचना नाय. अरे तुमच्या बघण्यात आसा कॊण असा
बाईल मानुस? जा निवडणुकीक उभ्या ऱ्हवात? आपल्या आवाटात तर कोण काय माझ्या बघण्यात नाय" जाणतो आता मुळ
मुद्द्याला आला होता. कसंही करून त्याला त्याच्याच घरात असलेली पाहुणी-भागीरथीला
निवडणुकीला उभे करायचे होते आणि त्यांनी तिला दिलेला शब्द खरा करायचा होता. अर्थात
त्यात कोणीही आडकाठी करणार नाही याची त्याला पूर्ण खात्री होतीच.
"माझ्या बायलेक मिया उभो
करतय" एवढा वेळ काडीने दात कोरत असलेला भोळाभाबडा सदा ताड्कन बोलला.
जाणत्याला हे अनपेक्षित होते.
"काय काय रे, मेल्या तुझ्या बायलेक शेणी तरी थापून येतीत?" जाणत्याला निवडणुकीसाठी कुणाचेच नाव नको होते.
"अगे बाये, निवडून इला काय शेणी थापूचे लागतले? कायतरीच काय? पुन माझ्या बायलेक शेणी थापून येतत हां"
-इति सदा
"तुका जाळून मेल्या! माहिती
नाय आणि काय नाय फुकटचो पुढे धावता. निवडणुकीक उभ्या
ऱ्हवाचा म्हणजे काय खायचा काम नाय. त्याका खूप ज्ञान
लागता. भाषण देवची लागतत. झालाच तर सरकारी कामाक मदत करुची लागता" जाणतो जवळजवळ बाजी मारण्याच्या बेतात होता.
"आपली जानकी काकी उभी ऱ्हवली
तर?" नुकताच मिसरूड फुटू लागलेल्या मधुने नाव
सुचविले.
"मेल्या मधग्या, मध्ये मध्ये पचका नको. आपल्याक
ज्या इषयातला कळना नाय, त्या इषयातला बोलायचा नाय आणि
जानक्याक काय याता? आवाटातल्या आवाटात भांडणा सोडयली
म्हणान कोण मोठा व्हना नाय. त्यांका रांधा, वाढा, खरकटी काढा इतक्याच सांगला. मिया सुचवतंय
नाव. माझा याक पाव्हणा आसा-भागीरथी" आता कुणाची भाडमूर्वत ठेवण्याची
जाणत्याला गरज नव्हती आणि वेळ जाऊ द्यायची नव्हती.
"चलाचा नाय. गावचाच
बायलमानूस कोणीतरी उभ्या ऱ्हवाक व्हया" पंढरी जरी हळू बोलला तरी ते
जाणत्याच्या तीष्ण कानांनी टिपलेच.
"पंढग्या मेल्या, रात्री माझ्या पैशाची दारू पिलय आणि आता माझ्यावरच उलाटय. ता काय चलाचा
नाय. माझो निर्णय ठाम आसा,मिया भागल्याक आपल्या निवडणुकीक
उभ्या करतलय. त्याका निवडून दिया सगळ्यांनी" जाणत्याने आदेश दिला. पण काहीतरी
चुकल्याचुकल्यासारखे वाटले सगळ्यांना.त्याच्या आवाजात पूर्वीचा जोर नव्हता. पण
एवढ्या वर्षाची सवयत्यामुळे त्यावर बोलायला कोणीच तयार होईना. पण जानकी बोलायला
लागली.
"असा कसा म्हणतास जाणत्यानु, परतेक वेळी आम्ही तुमच्या निर्णयाच्या बाजूक उभे ऱ्हवलु ते तुमच्या
जाणतेपणाचो मान म्हणान, जो वर्षानुवर्षे परंपरेने
तुमच्या घरात चालत इलो.आजही आम्ही तसेच वागतो,तुमचा काय
चुकला तरी ता आम्ही गोड मानून घेतला. कारण जाणत्याचो जो मान आसा तो मोडूक जीवावर
येता. पण आज ती परिस्थिती नाय आसा. तुमची आमची सगळ्यांची पोरां शिकान मोठी झाली.
जगाच्या अनुभवानं मोठी झालेली ही पोरां आता तुमकां आयकाची नाय. तेव्हा खंयचोय
निर्णय घेताना तो सदविवेक बुद्धिक असोच घ्याया. नायतर एक दिवस पश्चाताप करुची पाळी येयत तुमच्यावर, त्याव्हा
चायपानी देवन वाढयलेली पिलावळ तुमच्याबरोबर नसतली. आजपर्यत गावच्या फायद्यापेक्षा
स्वतःच्या फ़ायद्याचो इचार केल्यास. इषय आलो म्हणान सांगतंय. तुमच्या घराच्या बाजूक
दोन कुदंग्याच्या मेरेर असलेल्या एका काजीच्या झाडावरून दोन सख्ख्या भावातला
भांडान कोर्टात गेला. ते दोघे आपापली बाजू घेऊन तुम्ही जाणते म्हणान ते पहिले
तुमच्याकडे इले. एकाची बाजू उचलून घेत त्यांना तुम्ही कोर्टात न्याल्यात. बरोबर मा? काज लागती होती. कोर्टाच्या आदेशामुळे दोन्ही भावांका काजू काढून
म्याळानत. ते कितकी तरी वर्षा तुम्ही काढून इकल्यास. केस पंधरा वर्षे चालली आणि
कोर्ट त्या झाडाची मालकी सिद्ध करेपर्यत ते झाडही मोडान गेला. दोघंय भाव ऱ्हवाक
मुंबैक..केसीसाठी गावाक येवक-जावचो खर्च... वकिलांका हजारों रुपये खर्च...हिशोब
करा. ही तुमची पद्धत...एकाक चण्याच्या झाडार चढवून, दुसऱ्याक
खाली आपटून आपली तुंबडी भरण्याची ही वृत्ती बरी नाय. आपल्या हातून कुणाचा कल्याण
होत नसात तर निदान कोणाचा नुकसान व्हयत असा करूचा न्हय" जानकी तावातावानं बोलत होती आणि सगळेजण
तिच्याकडे अचंबित होऊन पहात होते. आजपर्यत जाणत्यासमोर कोणी मान वर करून बोलत
नव्हते, पण आज जानक्याने त्याला उलटोपाळतो करून ठेवला
होता. त्यांनतर आता आपली काही डाळ शिजणार नाही हे हेरून जाणत्या बाजूला
झाला.निवडणुकीची उमेदवार म्हणून जानकी उभी राहिली आणि भरघोष मतांनी निवडून आली, हे वेगळं सांगायला नकोच. पण या एका प्रसंगाने जाणत्याच्या 'जाणतेपणालाही' उतरती कळा लागली.
-भिवा रामचद्र परब
( दै.
लोकसत्ता लोकरंग पुरवणी दि.५एप्रिल,२००९ मध्ये प्रसिध्द )
No comments:
Post a Comment