नारायण! नारायण!! असा घोष करीत, त्याचबरोबर वीणेचा मंजूळ स्वर
तिन्ही लोकांत घुमवीत नारदाची स्वारी त्रैलोक्यात संचार करीत होती. अधूनमधून
कुठल्यातरी देवाची कागाळी करून देवांतच भांडणे लावण्याचा त्यांचा उद्योग सुरू होता:
परतू या देवपुत्राचा कोणताही उद्योगअनुचित नव्हता. त्यातून त्रैलोक्याचं कल्याणच
साधत असे. हे सर्व देवांनाही ठाऊक होते, म्हणूनच आजपर्यत ज्यांची ज्यांची त्यांनी कळ काढली
त्यांच्या मनांतही नारदांबद्दल आदरच ओतप्रोत भरलेला होता. नारदाच्या कोणत्याही कृतीतून अंतिमत: देवलोकांच्या
कल्याणाची तळमळ जाणवते.
विश्वनियंत्यांला या विश्वाचे रहाटगाडगे चालविण्यासाठी नारदाची गरज होती आणि नारद
हरप्रकारे आपल्या कृतीतून त्यांना मदत करीत होता.
पण आज मात्र नारदाची स्वारी कुणाची कळ काढण्याच्या
मन:स्थितीत नव्हती. सर्वस्पर्शी, सर्वज्ञानी आणि अंतर्ज्ञानी नारदाला एक प्रश्न
पडला होता. नारदाला प्रश्न पडला होता. नारदाला प्रश्न पडणे तसे आश्चर्यकारक! पण
तसे घडले मात्र निश्चितच! नारद त्रिकालज्ञानी विद्वान देवर्षी होता: परंतू ज्ञान कितीही संपादन केले तरी ते
कमीच! प्रश्न पडणे हा ज्ञानी माणसाचा स्थायीभाव. जेवढा माणूस ज्ञानी तेवढेच त्याला
पडणार प्रश्नही अनेक. आपले ज्ञानभांडार समृध्द करण्याचा तो एक प्रयत्न असतो. कण कण
वेचून मधमाशा पोळ्यात मध साठवितात, थेंबाथेंबाने वाढत जाऊन नद्या, नाले भरतात आणि सागराला विशालता प्राप्त होते. त्यामुळे नारदाला प्रश्न पडला तर तो गहन असणार यात शंकाच नाही.
आपला प्रश्न घेऊन नारद ब्रम्हदेवाकडे गेला आणि त्याच्यासमोर आपला प्रश्न
मांडला. “देवाधिदेव, आज मी एक प्रश्न मांडणार आहे, आपण त्याचे उत्तर द्याल अशी आशा आहे”
“वत्सा नारदा, तू सर्वज्ञानी आहेस, तुला तसे वरदान आहे. तरी तुला प्रश्न पडला? आश्चर्यच आहे! बोल काय आहे''
“माझा प्रश्न कदाचित गहन नसेल; परंतू मला त्याचे उत्तर सापडत नाही म्हणून मी आपणांकडे आलो. माझा प्रश्न असा
आहे, की संत कुणाला म्हणावे?संतमहिमा म्हणजे काय?''
“तुझा प्रश्न सोपा असला तरी त्याचे उत्तर देणे माझ्या हातात नाही. आम्ही म्हणजे ब्रम्हा,विष्णू,महेश अनुक्रमे जन्म (उत्पत्ती), पालन (स्थिती), नाश (लय) या तिन्ही स्थितींची जबाबदारी
आपापसांत वाटून घेतलेली आहे हे तुला माहितच आहे. त्यामुळे तुझ्या प्रश्नाचे
उत्तर भगवान श्री विष्णू देऊ शकतील. तू त्यांची भेट घे”
नारायण! नारायण!! असा घोष करीत नारद विष्णूच्या दर्शनाला निघाले. विष्णू
सप्तसागराच्या तळाशी शेषावर विराजमान असतील अशी नारदाची समजूत
होती; परंतू नारायण शेषावर नव्हते. कोठेतरी आत असावेत
असा अंदाज नारदाने बांधला आणि जप करीत तो तेथेच बसून राहिला. थोड्या वेळाने भगवान श्रीविष्णू शेषावर प्रकट झाले. नारदाने नमस्कार केला.
''बोला देवर्षी, कसं काय येणं केलं? स्वर्गातील सर्व क्षेमकुशल आहे ना''
“आपल्या कृपेने सर्व कुशल मंगल आहे प्रभो, पण मला एक सांगाल का? मघापासून मी आपल्या दर्शनाला तिष्ठत आहे: परंतू
मला दर्शन देण्यास विलंब का? या भक्ताच्या हातून असा कोणता बरे प्रमाद घडला? त्याची ही शिक्षा मला दिली. आजपर्यत असं घडलं नव्हतं'' नारद कळवळून विचारता झाला.
“नारदा, तुला विलंबाने दर्शन देण्यात तुPयाकडून कोणताही प्रमाद घडलेला नाही. मी पुजेमध्ये व्यस्त होतो'' नारद खिन्नपणे हसला. “प्रभो, मी गरीब बिचारा नारद,बरा भेटलो तुम्हांला खिल्ली उडवायला, तुम्ही देवाधिदेव भगवान विष्णू! आपली पुजा आम्ही भक्त करतो. त्रैलोक्यातहीही
आपलीच पुजा केली जाते, असे असताना आपण कुणाची बरे पुजा करता?''
“नारदा, माझं मोठेपण, माझं देवपण ज्या भक्तावर अवलंबून आहे असा नाथ, अक्रूर. उद्धव, स्वत: तू नारद अशा अनेक भक्तांची मी नित्य
नियमाने पुजा करतो. तुमच्यामुळे, तुमच्या निस्सीम भक्तीमुळे हे स्थान मला प्राप्त झालेले आहे. देव भक्तीचा भुकेला असतो
नारदा''
''धन्य आहे प्रभ,धन्य आहे!'' नारदाने हात जोडले.
''बोल नारदा, कशासाठी तू आला आहेस?''
''प्रभू, एक प्रश्न मला सतावतो आहे. त्याचे उत्तर मिळविण्यासाठी आपणांकडे धाव घ्यावी लागली.
संतमहिमा म्हणजे काय?'' यासंबंधी मी अनिभज्ञ आहे. कृपा करून आपण
सांगावे. विष्णू विचारमग्न झाले आणि उत्तरले,
''तुला एवढ्या साध्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही, काही हरकत नाही. असाच जा पृथ्वीतलावरील जंगलातील एका आंब्याच्या झाडावर एक सरपटणारा
प्राणी-सरडा आहे. त्याला हा प्रश्न विचार, तोच तुला या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल''
नारद अतिशय आनंदित झाला. थोडासा मनातल्या मनात कष्टी ही झाला. आपल्याला जे
माहित नाही ते पृथ्वीतलावरील एक सरडा सांगणार! पण ज्याअर्थी श्रीविष्णू आपल्याला त्याच्याकडे पाठवितात, त्याअर्थी यात काहीतरी मेख असावी असे त्याला वाटले.
श्रीविष्णूंचा निरोप घेऊन नारद थेट जंगलात पोहोचला आणि त्या सरड्याला गाठले. नारद
त्या सरड्याला काही प्रश्न विचारणार एवढ्यात त्या सरड्याचे लक्ष नारदाकडे गेले आणि
त्याने क्षणात डोळे मिटले. त्याचे कलेवर नारदाच्या समोर पडले. नारद
घाबरला. श्री विष्णूने आपल्याला त्याच्याकडे पाठविले आणि केवळ दृष्टीक्षेप
होताच त्याचे प्राणेत्क्रमण झाले. हे आपल्या चुकीमुळे घडले असावे याची खंत वाटून खिन्न वदनाने नारद विष्णूकडे
रवाना झाला. सगळा वृत्तांत त्याने विष्णूंना कथन केला. भगवान
काही बोलले नाहीत. फक्त हसले. म्हणाले, ''ठीक आहे, एक काम कर, एक वर्षानंतर बरोबर याच तिथीला, याच वेळी दुसऱ्या जंगलात
जा. ते्ये एक राघू बसलेला असेल. तो तुझ्या शंकेचे
निरसन नक्की करेल''
गतिमानानुसार दिवस उलटले. एका वर्षानंतर त्या तिथीला नारद जंगलात पोहोचला.
झाडावर राघू मजेत शीळ घालीत
बसला होता. नारद त्याच्याजवळ गेला
आणि बोलण्याचा प्रयत्न करू लागला; परंतू नारदाशी नजरभेट होताच पोपटाने मान टाकली.
नारद गडबडला, घाबरला, हे काय होत आहे तेच कळेना. तो पहा तसाच श्रीविष्णूंकडे गेला, त्यांना सगळा प्रकार सांगितलं
पण ते शांतच राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक मंदसे स्मित झटकले. त्यांनी पुन्हा नारदाला त्याच तिथीला
त्याच वेळेला जंगलातील हरणाला भेटायला सांगितले.
नारद भेटायला गेला आणि मागील दोन प्रसंगाप्रमाणेच नारदाची नजरभेट होताच
हरिणाची प्राणज्योत मालवली. नारदाला खूप दु:ख झाले. आपणच एक अपशकुनी आहोत असा एक
विचार डोक्यात चमकून गेला. या तिघांच्या मृत्यूमुळे त्याचे पातक आपल्या डोक्यावर असल्याचा भास त्याला होऊ
लागला. आपल्या प्रश्नांची उकल
करता करता आणखी कितीजणांचे बळी जातील याची त्याला लागली. त्यापेक्षा भगवान विष्णूंची क्षमा
मागून हा खेळ संपविण्याचे त्याने ठरविले.
भगवान विष्णूंनी नारदाचे स्वागत केले आणि सारा वृत्तांत ऐकल्यावर पुढच्या
वर्षी पृथ्वीतलावरील एका राजाच्या मुलाला त्याच्या
वाढदिवसानिमित्त भेटायला सांगितले; परंतू नारद कळवळून म्हणाला, “प्रभो, प्रभो हा काय खेळ आरंभलास? माझ्या डोक्यावर
तीन पातकांचे ओझे आहे. आणखी किती ओझी देणार आहात? प्रभा, क्षमा करा मला, यानंतर माझ्या प्रश्नांचे
उत्तर नाही मिळाले तरी चालेल, पण मी पुन्हा कोठेही जाणार नाही. फक्त या पातकांचे प्रायश्चित घेण्यासाठी मी
जाणार आहे'' नारद त्याच तिरमिरीत निघून जाणार एवढ्यात
विष्णूनी त्याला थांबविले. “नारदा, या त्रिलोकांत अशी एकही गोष्ट नाही की जी
कारणांशिवाय घडते. प्रत्येक घटनेमागे कोणते ना कोणते कारण असते आणि या सगळ्या विधीलिखितांप्रमाणे
घडत असतात. आपण मात्र निमित्तमात्र! मागे काय घडले आणि पुढे काय घडणार आहे याची काळजी करू नकोस. घडायचे ते घडून जाणार आहे.
म्हणूनच सांगतो, तू त्या राजाच्या मुलाला जाऊन भेट, मला खात्री आहे, यावेळी तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची
उत्तरे मिळतील”
नारद राजाच्या दरबारात पोहोचला. मुलाच्या वाढदिवसानिमित्त सगळीकडे जल्लोश उडाला होता. सर्वत्र आनंदीआनंद
पसरला होता. राजाराणी ही नवससायासाने झालेल्या एकुलत्या एक मुलाच्या कोडकौतुकात
दंग झाली होती. मात्र नारद फारच दु:खी होता. आज आपण आणखी एका पातकाचे धनी होण्यास
निघालो आहेत याची जाणीव त्याला सतत होत होती परंतू आता माघार घेणे शक्य नव्हते. येणाऱ्या संकटाला तोंड देणे क्रमप्राप्त होते. दरबारात नारदाचे अचानक होताच सर्वाचा
आंनद द्विगुणित झाला. देवर्षी नारदाचे आगमन म्हणजे शुभशकुनच जणू! राजाने स्वत:
उठून त्याचे स्वागत केले.
सगळे क्षेमकुशल झाल्यावर राजाने आपल्या पुत्राला
देवर्षीच्या पायावर ठेवले. नारदाने त्या तान्ह्या मुलाकडे धडधडत्या अंत:करणाने पाहिले मात्र तो
मुलगा अत्यानंदाने हसू-खिदळू लागला आणि नारदाचा जीव भांड्यात पडला. नारदाने त्याला
शुभाशीर्वाद दिले. त्याने संतमहित्म्याबद्दलचा आपला प्रश्न विचारला. बालकाने आपले
छोटे छोटे दोन्ही हात जोडले. “देवर्षी नारद, आपल्याला माझा प्रणाम, शेषशयी भगवान विष्णूला माझा नमस्कार.'' तो बालक पुढे बोलायला लागला आणि नारद आश्चर्यचकित होऊन ऐकू लागला. “भगवंताने, माझ्यासारख्या क्षुद्र माणसाकडे आपणाला पाठविले, हा त्यांचा मोठेपणा, परंतू संतमहिमा वर्णन करण्यास, काही जन्म संताच्या दर्शनाने पावन झालेला माझ्याशिवाय दुसरा पामर कोण आहे? हे मी अंहकाराने नाही, विनम्रभावाने सांगतोय देवर्षी, आपण स्वत: एक महान संत आहात. परमेश्वरभक्तीने व्यापून टाकणाऱ्या या विश्वात आपण भ्रमण करता. दीनदुबळ्यांच्या कल्याणाचा
अहोरात्र ध्यास बाळगणारे आपणच. म्हणूनच मी सरड्याच्या रूपाने
पृथ्वीतलावर जन्म घेतला तेव्हा आपल्या दर्शनाने माझा दुसरा जन्म झाला. दुसऱ्या राघूच्या जन्मी आपले पुन्हा दर्शन घडले आणि हरिणाचा जन्म
झाला. त्याही जन्मी आपल्या पावन दर्शनाने हा नरदेह प्राप्त झाला. चौऱ्याऐशी लक्ष
जन्मानंतर कुठे हा मनुष्य जन्म मिळतो. परंतू आपल्या केवळ दर्शनाने
तीन जन्मानंतर मनुष्यदेह मिळाला, तोही राजघराण्यात! आयुष्याचा हा भवसागरही मी
आपल्या आशीर्वादाने पार पाडणार आहे. देवर्षी,आपल्यासारख्या संत महात्म्याच्या दर्शनाने ते शक्य होते.
संतमहिमा, संतमहिमा म्हणतात हो
हाच!" बालकाने आपले बोलणे थांबविलं. देवर्षी नारद आणि बालक यांच्यामध्ये
चाललेला हा संवाद फक्त दोघांपुरताच मर्यादित होता. या साऱ्या प्रकाराशी
अनभिज्ञ असलेली राजा राणी
नारदाकडे एकटक पहाणाऱ्या बाळाचे कौतुक करीत होते. नारदाला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते.
-भिवा
रामचंद्र परब
(पूर्व
प्रसिद्धी सामना रविवार पुरवणी
दिनांक ०५/१०/१९९७)
No comments:
Post a Comment