Wednesday, 30 November 2016

शांती हरविलेले 'मन:शांती'

'मन:शांती' ही अनुवादित कादंबरी. इस्तुंबल विद्यापीठातील तुर्की वाड्मयाचे अभ्यासक अहमद हमदी तानपिनार यांची 'हुजूर’ (Huzur)ही तुर्की भाषेतील कादंबरी १९४९ मध्ये चार भागात क्रमश: प्रसिध्द झाली होती. तुर्की भाषेत हुजूर म्हणजे शांती. हीच कादंबरी त्यानंतर 'A Mind At Peace’ या नावाने ही इंग्रजीमध्ये भाषांतरित झाली. या कादंबरीचा मराठी अनुवाद सविता दामले यांनी केला आहे. 

या कादंबरीचा काळ दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीचा. ओटोमन राज्याची फाळणी झाल्यामुळे नवीन सरकार स्थापन झाले आणि त्यानंतर तुर्कस्तानला आपल्या जुन्या रूढी परंपरा यांना तिलांजली देऊन पाश्चात्य संस्कृतीशी जुळवून घ्यावे लागले. आधुनिकीकरणाच्या रेट्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली, जे परिवर्तन होऊ पाहत होते, त्या परिवर्तनातून जाणाऱ्या मुमताझ या सर्वसामान्य तरुणाची आणि त्याच्या जीवनात आलेल्या इहसान, नुरान, सुआद यांची ही कहाणी आहे. चार भागांत विभागलेली ही कादंबरी तुर्की समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक इतिहास कथन करते. तानपिनार यांनी तुर्की आणि मुस्लीम संस्कृतीचा मेळ साधत समाज,त्यातील सामाजिक-सांस्कृतिक बदल सूक्ष्मपणे टिपले आहेत आणि आपल्या अलंकारिक भाषेतून आणि ओघवत्या शैलीतून कथन केले आहेत.

ओटोमनवर कब्जा करतानाच्या धुमश्चक्रीत आठवडाभराच्या अंतराने अकराव्या वर्षी मुमताझचे आईवडील मारले गेले. पोरक्या मुमताझला त्याच्या चुलतभाऊ इहसान आपल्या मुलांसारखा संभाळतो. त्यामुळे तो मुमताझसाठी गुरू, गाईड सर्वकाही आहे. याच इहसानच्या आजारपणाने कादंबरीची सुरुवात होते. आपल्या भूतकाळातील अनेक आठवणी जाग्या करीत खचलेले मुमताझ, बॉस्फरसच्या फेरीबोटीतील प्रवास, त्याची अनाकलनीय विवाहीत  प्रेयसी नुरान आणि त्यांची आकाराला आलेली आणि मध्येच संपलेली प्रेमकहाणी, दरम्यानच्या त्याच्या प्रणयलीला, या दोघांमध्ये आलेले सुआद, मुमताझच्याच घरी सुआदची आत्महत्या, या आणि अशा अनेक घटना एकापाठोपाठ एक घडत जातात. ढोबळमानाने असे म्हणता येईल की कादंबरीचा भाग पहिला आणि चौथा विषाद, दु:ख, तणाव, युद्धाच्या घडामोडी यांनी व्यापलेला आहे तर दुसरा आणि तिसरा भाग हा मुमताजचा भूतकाळ आहे.

राजकीय बदलामुळे आणि दुसऱ्या युद्धाच्या संभाव्य परिणामांमुळे राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय ज्या घडामोडी घडतात त्याचे सामाजिक आणि राजकीय पडसाद कादंबरीत उमटत राहतात. अनिश्चितेच्या वातावरणामुळे समाजमन आतल्या आत गुदमरत असते. नात्यांच्या ओढाताणीतून मानसिक आणि भावनिक स्थिस्तंतरे चालूच असतात. पुस्तकाच्या नावांत शांती आहे. परंतु सततचे ताणतणाव, चिंता आणि युद्धाची स्थिती, अस्थिरता अशा विरोधाभासातून कादंबरीचे कथानक पुढे सरकते. सविता दामले यांनी मराठी भाषेची नजाकता संभाळून कादंबरीचा छान अनुवाद केला आहे.

पुस्तकाचे नाव     : मन:शांती 
मूळ लेखक        : अहमद हमदी तानपिनार 
अनुवाद             : सविता दामले 
प्रकाशक           : पॉप्युलर प्रकाशन
पृष्ठे                   : ५१०.  किंमत : रु ५५०/-
 -भिवा रामचंद्र परब
(दै. सामना रविवार पुरवणी च्या सौजन्याने)

Saturday, 26 November 2016

ज्वालामुखी

चिमण्यांनो, कितीवेळा सांगितलं तुम्हांला;
कुणी म्हणतो म्हणून
ज्वालामुखीच्या तोंडावर असं घरटं बांधत
जाऊ नका!
भावनेचा उद्रेक केव्हा होईल सांगता येत नाही ना!
आपले पंख कापल्यावर,
निरभ्र आकाशात उडण्याचे आमंत्रण
कसे पेलवेल तुम्हांला?
पण आता समुद्र उलथवण्याच्या आव्हानासाठी
काळीज घट्ट करा;
सामोरे जा, पहाडाच्या उंचच उंच भिंतीना.
सूर्याला धरायला जाताना
पिसारा आणखी फुलवा;
सामावून घ्या त्याला आपल्या
इवल्याशा पंखात!
त्याच्या तळपत्या किरणांनी दिपून जाल,
मार्ग बदलाल तर खबरदार,
चोची करा आणखी धारदार;
ज्वालामुखी थोपण्याइतपत:
सामर्थ्यवान होऊ द्यात त्या!
जयापराजयाची तमा न बाळगता
तुटून पडा त्यावर!
मारूतीनं सूर्याला गिळले होते;
अगस्तीने समुद्र प्राशन केला होता;
मग अशक्य काय आहे तुम्हांला?
तशीच वेळ आली तर ज्वालामुखीच धरा चोचीत;
बुडवा त्याला समुद्रात खोलवर!
समुद्र आणि ज्वालामुखी;
दोन तुल्यबळात जुंपली की,
निर्धास्त रहा ज्वालामुखीच्या आत
घरटं बांधून.
राख मात्र तशीच राहू द्या आठवण म्हणून!
नाहीतर त्याचाही लिलाव मांडाल बाजारात.
जळल्यावर मोल अधिक येते;
गिऱ्हाईक पण जास्त आहेत;
हुरळून जाऊ नका.
लक्षात ठेवा,
त्याच राखेतून अग्नी पेटविला जाईल.
ज्वालामुखीपेक्षाही अधिक दाहक असेल ही आग!
आणि या आगीनं;
तुमचंच घरटं जाळलं जाईल अगदी तुमच्यासकट!

                                  -भिवा रामचंद्र परब

Friday, 25 November 2016

शहाण्याला शब्दांचा मार

    नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या आपटेबाई कामधाम आटोपून वाचीत पडल्या होत्या. एवढ्यात दरवाजाची बेल वाजली. बाईनी काहीशा अनिच्छेने दरवाजा उघडला. दरवाजात निलेश उभा होता. त्यांचा माजी विद्यार्थी. परदेशात उच्च शिक्षण घेऊन तो नुकताच भारतात परतला होता. बाई नुकत्याच सेवानिवृत्त झाल्याचे त्याला कले म्हणून तो त्यांना भेटायला आला होता. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर तो निघून गेला. पण बाई मात्र आपल्या लाडक्या विद्यार्थ्याच्या आठवणीत गुरफटल्या. निलेशच्या बाबतीत काही वर्षापूर्वी घडलेला तो प्रसंग त्यांना जशाचा तसा आठवला.
   .....सातवी इयत्तेच्या अ वर्गात आपटेबाई शांतपणे शिकवीत होत्या. वरकरणी त्या शांत दिसत असल्यातरी गेले काही दिवस मुलां-मुलींच्या तक्रारी होत्या की, त्यांच्या दप्तरातील काही वस्तू गायब होतात. कुणाची पट्टी, पेन्सिल, कुणाचे पेन तर कुणाची वही मित नाही. अशा प्रकारचे तक्रारीचे स्वरूप होते. सातवीची मुले म्हणजे बारा-तेरा वर्षाच्या आत-बाहेरची. एक दोघाच्या तक्रारी असतील ते काही गांभीर्याने घेण्यासारखी बाब नसते हे त्यांना एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर त्यांना कले होते. पण काही मुले सातत्याने तक्रारी करीत होती आणि त्यातील गांभीर्याची बाब म्हणजे ही सर्व मुले एकाच मुलाकडे बोट दाखवीत होती. म्हणूनच तर बाई बुचकळ्यात पडल्या होत्या. या गोष्टीचा आज सोक्षमोक्ष लावायचाच, असा त्यांनी निर्धार केला होता.
        निलेश वर्गात शांतपणे बसलेला असायचा. अतिशय  हुशार नाही पण एकदम ढ ही नाही असा हा विद्यार्थी. विचारलेल्या प्रश्नांची येतील तेवढीच उत्तर देणे. कलं नाही तर विचारणे नाही. कलं तर अधिक बोलणं नाही. मुलांच्यात खेणं नाही की कामाच्या व्यतिरिक्त मिसणं नाही. शाळा भरायच्या अगोदर पाच निमिटे नित्यनियमाने येणे आणि घंटा झाल्याबरोबर निमूटपणे जाणे, असा हा विद्यार्थी सर्वच शिक्षकांना एक कोडं वाटायचा. त्याने खेळा, स्पर्धात भाग घ्यावा म्हणून सर्वानी बरेच प्रयत्न केले पण व्यर्थ! कोडं काही सुटत नव्हतं.
      आणि अशा या अबोल निलेश कडे सर्वजण संशयाने पाहात होते,हे केव आश्चर्य! आपटेबाईना सुद्धा याच गोष्टीचे नवल वाटत होते.
       टण.. टण.. टण.. मधल्या सुट्टीची घंटा झाली. मुलाच्या गोंगाटात त्या वर्गाबाहेर पडल्या. त्याबरोबर मुलांमुलींचा घोकाही बाहेर आला. बाई स्टाफरूममध्ये आल्या तेव्हा त्यांच्या सर्व सहकार्यांनी खाण्याचे डब्बे उघडले,  पण आज बाईचे खाण्याकडे लक्ष नव्हते. काही वे तिथेच विचार करून त्या उठल्या आणि सहज म्हणून जाण्याच्या अविर्भावात आपल्या वर्गासमोरून गेल्या. जाता जाता त्यांनी वर्गात लक्ष टाकले. वर्गात निलेश एकटाच बसलेला होता. बाईनी मनात म्हटलं,  मुलांच्या तक्रारीत तथ्य असेल तर निलेशला निश्चितच पकडू! बाई दरवाजाच्या आडोशाला उभे राहून निलेश काय करतेा आहे ते पाहू लागल्या. वर्ग सर्व खाली झाला हे पहाताच निलेश हळूच उठला आणि त्याने अविनाशच्या दप्तरात हात घातला. आता मात्र बाईँना खात्री पटली की मुले बोलतात ते खरं आहे. वर्गातील चोरीमागे निलेशचा हात आहे. आजपर्यत आपण त्याला एक चांगला मुलगा समजत होतो. मुलांना चांगले संस्कार मिळावे, ते देशाचे एक चांगले नागरीक बनावेत यासाठी आपण जीव तोडून प्रयत्न करतो;  पण मग ही मुले अशी का वागतात? आपण त्यांना संस्कार देण्यात कमी पडतो का? त्यांचे विचारचक्र सुरू झाले. यापूर्वीही बाईनी निलेशची सहज म्हणून त्याच्या घरची चौकशीही केली होती. पण त्यातून हाती काही लागले नाही. त्याचे आईवडील दोघेही नोकरीला; तेही चांगल्या हुद्यावर! निलेशने मागावे आणि आईबाबांनी ते त्याला त्वरीत आणून द्यावे, अशी घरची उत्तम परिस्थिती असताना त्याने चोरी का करावी? आणि ही चोरी तो केव्हापासून करतो? या विचाराने बाईचे डोके भणाणले. प्रथम आपण शांत रहावे. सहकारी शिक्षकांचा सल्ला घ्यावा आणि मगच निलेशबाबत निर्णय घ्यावा, असे त्यांनी ठरविले.
       नवीनच बदलून आलेल्या त्यांच्या सहकारी साटमबाई म्हणाल्या, ’अग, गेल्या वर्षी मी दुसऱ्या शाळेत होते ना, त्या शाळेत माझ्या वर्गात असा एक मुलगा होता. चोरी करायचा. एक दिवस त्याला मी खूप मारलं आणि त्याच्या आईवडिलांना बोलावून त्यांना सगळं सांगितलं. त्यांनीही त्याला बेदम मारला. पण त्याच्यात काहीच सुधारणा झाली नाही. अखेर त्याला शाळेतून काढून टाकला. एकदा का चोरीची सवय लागली की ती सुटणं कठीण ग बाई ! साटम बाईनी एक दीर्घ सुस्कारा सोडला. दुसऱ्यावीबाई वयस्कर होत्या. अनुभवी पण धार्मिक आणि देवभोळ्या. त्यांनी आपटेबाईना सांगितले, ’वर्गात जी व्रात्य, दंगेखोर मुले असतात, त्यांना एका बाजूला घेऊन मी त्यांच्या कानात हळूच सांगते की, तुम्ही जे काही करता ते सगळं देव पाहतो आणि रात्री झोपल्यावर तो तुमचा कान कापून नेतो. दुसऱ्या दिवशी तुमचा कान जाग्यावर असला तरी तुम्हांला अजिबात ऐकू येणार नाही. देव तुम्हांला अशी शिक्षा करील. काही मुले ऐकतात आणि खोडकर आणि व्रात्यपणा सोडून देतात.''  बाईचा हा सल्ला ऐकून तशाही स्थितीत बाईना हसू आले, बाई अजूनही आपल्या जुन्या जमान्यात वावरत आहेत तर...? त्या मनातल्या मनात पुटपुटल्या. अर्थात हे दोन्ही मार्ग त्यांना पसंत पडणे शक्य नव्हते. कारण आजपर्यत त्यांनी वर्गात केव्हा छडीचा आधार घेतला नव्हता. कधी प्रेमानं तर कधी केव नजरेच्या धाकानं त्या मुलांना गप्प बसवीत. पण आजची ही घटना सामान्य दिसत असली तरी त्याचा दुरगामी होणारा परिणाम ओखून पावले उचलणे आवश्यक होते. त्यांनी मनात काही एक विचार केला. निलेशच्या प्रामाणिकपणाला अप्रत्यक्ष आवाहन करायचे. जर तो खरोखरच प्रामाणिक असेल तर तो सगळं सांगून मोकळा होईल. नाहीतर बघू पुढे काय करायचे ते!
        मधल्या सुट्टीमध्ये वर्ग पुन्हा भरले. बाईने सावकाशीने आपल्या वर्गात निघाल्या. वर्गात शिरताच शिल्पा व अविनाशने पेन,  पेन्सिल चोरीला गेल्याची तक्रार केली. मात्र जो तो निलेशकडे पाहू लागला. निलेशने खाली मान घातली.
सर्वानी माझ्याकडे पहा!' बाईनी आदेश दिला तसा सारा वर्ग जिज्ञासेने बाईकडे पाहू लागला. 
निलेश उभा रहा आणि तुझ्याकडे असलेले पेन, पेन्सिल इकडे घेऊन ये'' निलेश जाग्यावर उभा राहिला.स्तब्धपणे, कदाचित त्याला हे अनपेक्षित असावे. निलेश, पहिल्यांदा इकडे ये. मधल्या सुट्टीत मी दाराच्याआड उभी राहून सर्व पाहिले आहे. मला जास्त बोलायला लावू नको'' बाईच्या मनात नसताही बाईचा स्वर करडा झाला होता. आता मात्र निलेश उठला. आणि वर्गाच्या कचरापेटीत टाकलेले पेन आणि पेन्सिल आणून त्याने बाईना दिली. सगळा वर्ग शांत झाला. अगदी पिनड्राप सायलेन्स! खाली मान घालून लटपटत्या पायाने निलेश उभा होता. बाईनी बोलायला संथपणे सुरूवात केली.
मुलानों, आज आपण सर्वानी निलेशचे कौतुक करूया'' सर्व मुले आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागली. बाईनी आपले बोलणे पुढे चालू ठेवले. त्याने शिल्पा, अविनाशच्या हरवलेल्या दोन्ही वस्तू आणून दिल्या. त्याने वस्तू घेतल्या नव्हत्या. आपल्या वर्गातील मुलांच्या वस्तू दुसराच कोणतरी पवित होता. आपल्याला त्याचे अद्याप नांव कUलेले नाही, पण तुम्हां दोघांच्या वस्तू नेताना त्याला निलेशने पाहिले. त्यामुळे घाबरून त्याने त्या वस्तू कचऱ्याचे पेटीत टाकून पलायन केले. निलेशने त्याला नक्की पाहिले असणार, आपल्याच मित्रापैकी कोणी असेल म्हणून तो सांगत नसणार, पण केव्हातरी तो नांव सांगेलच, पण त्याआधी आपण त्याचे टाÈयांच्या गजरात कौतुक करूया!  महद्आश्चर्याने काहीच न कल्यामुळे मुलांनी जोरजोराने टाळ्या वाजविण्यास सुरवात केली.
      निलेश आतापर्यत सारे ऐकत स्तब्धपणे उभा होता. त्याला हे अचानक काय होते आहे हेच कळेना. त्याच्या डोळ्यातून घळाघळा आसवे वाहू लागली. हुंदक्यावर हुंदके देत तो रडू लागला. गदगदत्या स्वरात तो म्हणाला, ’बाई, माझं कोतुक करू नका. मीच तो चोर आहे’
छे, काहीतरीच काय? कसं शक्य आहे ते? तुझ्या सारखा एवढा चांगला मुलगा असे करील असे मला तर वाटत नाही''
बाई, खरंच सांगतो, आतापर्यत मुलाच्या वस्तू मीच पवीत होतो. मी चांगला मुलगा अजिबात नाही''
ठीक आहे, तूच सांगतोस म्हणून मी क्षणभर विश्वास ठेवतो. पण या मुलांच्या वस्तू का घेतल्यास? बाईनी आणखी सौम्य शब्दांत त्याला विचारले.
ही सगळी शिल्पा, अविनाश, विनायक, अनिकेत,सौरभ, मंदार, मंदा, अहमद, वैशाली हे सर्वजण मला चिडवतात- मी चोर आहे म्हणून''
अस्सं? पण ही मुले तुलाच का चिडवतात?
बाई, गेल्या महिन्यात मला सौरभचे पेन सापडले होते. मी ते त्याला द्यायला गेलो तर ते पेन मीच चोरले म्हनून सौरभ व अविनाशने मला मारले आणि सर्वजण मला चोर चोर म्हणून चिडवू लागले. त्यामुळे चिडून त्यांना धडा शिकविण्यासाठी मी यांच्या काहींना काही वस्तू पवू लागलो. दडवून ठेवू लागलो.
एकूण प्रकार असा आहे तर! बरं,  दडविलेल्या बाकीच्या वस्तू कोठे आहेत?
आपल्या बागेतल्या एका झाडाखाली लपवून ठेवल्या आहेत''
जा पटकन् आणि घेऊन ये, ज्यांच्या आहेत त्यांना त्या देऊन टाक'' निलेशने त्या वस्तू आणून ज्याच्या त्यांना देऊन टाकल्या. बाईनी हातात पट्टी घेतली. मुलांना वाटले बाई आता निलेशला चोपून काढणार. पण बाईनी बोलायला सुरूवात केली. आजच्या घटनेला जेवढा निलेश जबाबदार आहे तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त ही सात मुले जबाबदार आहेत. कारण निलेशने प्रामाणिकपणे पेन परत केल्यामुळे त्याला चोर म्हणून त्याला हिणवले. त्यामुळे एका प्रामाणिक मुलाला अप्रामाणिकपणे वागावे लागले. बाकींच्या मुलांची ही प्रथमच वे आहे म्हणून मी त्यांना शिक्षा करीत नाही. मात्र निलेशला त्याच्या या कृतीबद्दल फार मोठी शिक्षा करणार आहे'' आपटेबाईनी आपले बोलणे थांबविले. सर्व मुलांची उत्सुकता आता शिगेला पोहचली होती. सर्वाची उत्सुकता अधिक न ताणता बाईनी पुन्हा बोलायला सुरवात केली. मी निलेशला अशी शिक्षा जाहीर करते की, त्याने या वर्षापासून वर्गात सतत पहिल्या क्रमांकाच्या स्पर्धेत असले पाहिजे. त्याने शाळेचा आदर्श विद्यार्थी बनावे , हीच ती शिक्षा!''
       क्षणभर बाई काय बोलतात हेच वर्गाला कळेना. पण त्याचा अर्थ लक्षात येताच मुलांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. निलेश होकारार्थी मान हालवित आणि डोळयातील आसवं पुसत जाग्यावर जाऊन बसला.
      ...आज निलेश भेटायला आला आणि बाईना हे सगळे आठवले. आपण त्यावेळी दाखविलेला विश्वास निलेशने सार्थ करून दाखविला. आपण केलेले संस्कार वाया गेले नाहीत याचा बाईना अभिमान वाटला.

Tuesday, 22 November 2016

भावमधुर गद्यकाव्य

विनोबांची ‘गीताप्रवचने’ आणि कविश्रेष्ठ रवीन्द्रनाथांची 'गीतांजली' च्या प्रभावाने भारून जाऊन भावभक्तीत डुंबलेल्या सश्रद्ध मनाने भगवंताशी केलेला संवाद म्हणजेच सखाराम यादव पाटील यांचे भावसंवाद हे पुस्तक. जगतनियंत्याविषयी मनात असलेली ओढ, लौकिकाच्या पलीकडचा लागलेला ध्यास आणि ‘मी’ पण नाहीसे करण्याची तळमळ असलेल्या, भक्ताने परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, मार्गदर्शनासाठी, त्याच्या आशीर्वादासाठी स्वत:शीच गुणगुणलेले, हे एक भावमधुर गद्यकाव्य आहे. परमेश्वराची ही एक प्रसन्न, सुबोध व मांगल्यपूर्ण प्रार्थना आहे. यात भजनचिंतनाने अंतर्मुख होऊन देवाशी केलेले हितगुज आहे. काव्य आणि तत्वज्ञान याचा मनोहर संगम असलेल्या या अनुभूतीतून निर्माण झालेल्या या भावसंवादात भौतिक जीवन आणि आध्यामिक बैठक तसेच विश्वबंधुत्वाचे नाते याविषयी सखोल चिंतन आहे. देवाला शोधण्याच्या प्रयत्नातून याचा जन्म झाला आहे. हे एक प्रकारचे आत्मनिवेदन आहे.

'समीपदर्शन' आणि 'सरूपदर्शन' अशा दोन भागात पुस्तकाची मांडणी केलेली असून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि प्राचार्य गजमल माळी यांनी अनुक्रमे पुरस्कार आणि प्रास्ताविक लिहिलेले आहेत. 

सामन्यांच्या जीवनात काही वेळाअलौकिक असामान्य असे क्षण येतात. मनाला स्पर्शून जातात. सुप्तावस्थेत असलेले हे क्षण येतात व ओसरून जातात. या क्षणांना बांधून ठेवण्याची कला सर्वांकडे असतेच असे नाही. पण ज्यांच्याकडे या दिव्य क्षणांना शब्दबद्ध करण्याचे सामर्थ्य असते, त्यावेळी सारे क्षण अमृताचे होऊन शब्दांचे रूप घेतात. एक अक्षय आनंदाचा ठेवा साठविला जातो. श्री पाटील यांनी आपल्या आयुष्यातील असे क्षण शब्दबद्ध केले आणि ‘भावसंवादा’ तून मराठी रसिकांना सादर केले. या पुस्तकातील लेखन हे एका तंद्रीतून घडलेले आहे. कळीचे फुल होणे, दिवसा-रात्रीचे कालचक्र अथवा निसर्गातील होणाऱ्या क्रिया-प्रक्रिया हे सारे आपसूकच होत असले तरी त्यामागे अज्ञात हात कार्यरत असतात. याच अज्ञाताचा, परमेश्वराच्या अस्तित्वाचा, दाही-दिशांतून शोध घेण्याचा प्रयत्न, प्रत्यक्ष भेटण्याची आस... यातूनच हे लिखाण झालेले आहे. परमेश्वरावरील भक्तीच्या आंतरिक प्रेरणेने लिहिलेल्या या आत्मनिवेदनात अंतर्विरोध आहे. ओढ ज्याची लागली. त्याविषयीचे अज्ञान मनाला बेचैन करते. निर्विषय आनंदाचा अनुभव येतो. त्याचबरोबर तो आनंद अनादि-अनंत आहे. असाही अनुभव येतो. त्त्याला शोधण्यासाठी, त्याच्या साक्षात भेटीसाठी हा पुढे पुढे चालतोच आहे. वाट संपत नाही. कोडे उलगडत नाही. मात्र परमेश्वर भेटीची आस वाढत वाढत जाते. कधी कधी अंतर्मनातून देवाचे शब्द ऐकू येतात. स्वत:च्या आंतरज्योतीत देवाची ज्योत एकजीव झाली आहे. असा प्रत्यय येतो. पण यातना संपत नाहीत.

श्री पाटील या आधात्म प्रवाशाने अध्यात्म्याच्या मार्गाने चालताना आलेले अनुभव आपल्या साक्षात्कारी शब्दांत गुंफून ठेवलेले आहेत. शब्दातीत असणाऱ्या सगुण निर्गुण गूढ भावाचे गुंजन प्रस्तुत प्रार्थनेत केलेले आहे. ‘जीवात्माने परमात्म्याच्या प्राप्तीसाठी केलेली व्याकूळ प्रतीक्षा’ असे त्याचे स्वरूप आहे.

समीपदर्शनात भक्त परमेश्वराच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करतो, तळमळतो. देवळामागून देवळे धुंडाळतो. तीर्थक्षेत्री जातो. प्रत्येक वेळी परमेश्वर समोर असल्याचा भास होतो, पण केवळ भासच! त्याला भेटायला, चरणाला निठी मारायला जावं तर तो पुन्हा दूर उभा, क्षितिजासारखा! आळवण्या-विनवण्या करून सुध्दा तो भेटत नाही. कारण अजून त्याने काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्ररिपुवर विजय मिळविलेला नाही. परमेश्वर भेटीमागे अलिप्त स्वार्थ दडलेला आहे. त्याच्यात अजुन ‘मी’ आहे, अहंकार आहे. “आकाशासारखा अगाध नि अनंत विचारांचा ‘मी’ होईन. माझे चित्त ‘मी’ निश्चल ठेवीन. चंद्रासारखा ‘मी’ हसमुख राहीन. दु:खाचे काटे ‘मी’ माझ्या हृदयी लपवून फुलासारखे प्रफुल्लीत अंत:करण ठेवीन. फुलांचा संपूर्ण सुगंध निसर्गाकरिता असतो तद्वत 'मी' माझी कर्मे जनताजनार्दनाकरिता करीन. सागरासारखा ‘मी’ मर्यादशील राहीन. बऱ्या वाईट विकारावर नियंत्रण ठेवून ‘मी’ मनाचा तोल बिघडवू देणार नाही” चांगल्या विचारातही 'मी' आहेच. 

चराचरात परमेश्वर भरलेला आहे. निर्गुण-निराकारी त्याचे अस्तित्व आपल्याही शरीरात मनाच्या गाभाऱ्यात वास करून आहे. याची दखल न घेता हा अज्ञानी भक्त त्याला शोधीत आहे. कधी कधी परमेश्वराची भासमय मूर्ती त्याच्या हृदयात विराजमान होते. तरीही त्याच्या सरूप दर्शनासाठी या भक्ताने गावोगाव पालथे घातले. नद्या-नाले ओलांडले, पर्वत उलंघिले. सागर तरून गेला. खंड-उपखंड पाहिले. वानरांचे चित्कार ऐकले. वृक्षराजी, कोकिळेचे कुजन, भुंग्याचे गुंजारव, वन्यपशूंच्या गर्जना ऐकल्या. कड्यावरून कोसळणारे प्रपात पाहिले,त्याचे तुषार अंगावर घेतले. सकाळचा सूर्योदय आणि संध्याकाळचा सूर्यास्त तसेच पौर्णिमेच्या पिठूर चांदण्याच्या राती आणि अमावास्येच्या काळ्याकुट्ट राती या भक्ताने पाहिल्या आणि या साऱ्यामध्ये तोच भरून उरलेला आहे, सामावलेला आहे. याचा प्रत्यय आला. ‘मी’ पणाचे ओझे झुगारून देऊन प्रभूचरणी लीन झाला. जीवा-शिवाची ओळख पटली. जगाचा मोक्ष हाच आपला मोक्ष आहे. याची जाणीव झाली तेव्हा व्यक्तिगत प्रार्थना संपली. विश्वबंधुत्वाची भावना निर्माण झाली. त्यात चैतन्य निर्माण करताना श्री पाटील लिहितात, “हे देवी शारदे, तुझे बोट धरून हा बालक चालू लागला आहे. तुझ्या कृपाप्रसादाने तो सारी सृष्टी डोळसपणे पाहील. अभ्यासील आणि लेखणी उचलील. परमेश्वराच्या महिम्याचे वर्णन करील. जगाच्या सुखाचे संवर्धन आणि दु:खाचे परिमार्जन तो आपल्या लेखणीच्या फटकाऱ्याने करील. जगाच्या हुकुमशाही आणि लष्करशाहीच्या जुलमी आणि अन्यायी राजवटीवर तो टीकास्त्र चालविल. लोकशाहीचा तो पुरस्कार करील. राष्ट्रभक्तीचे तो पोवाडे गाईल. मानवता, धर्मपालनाचे आवाहन करील. वर्गलढे, स्त्री-दास्य, गुलामगिरी, स्पृशास्पृश्यभेद आणि वर्गविशेष यावर आपले उत्कृष्ट विचार मांडून तो समतेचा, सत्याचा नि न्यायाचा पुरस्कार करील. त्याचे साहित्य म्हणजे सत्य,शिव, सुंदरमचा आविष्कार होईल”

श्री पाटील यांच्या लेखणीत ‘तोच’ भरून राहिला आहे. त्याच्याविषयीची भाव-भावना विचार भक्ती प्रकट झाली आहे. मनाच्या विशिष्ट स्थितीतून, निर्मळ मनातून स्वाभाविकपणे-सहजपणे उतरलेले हे साहित्य मानवी जीवनाच्या मांगल्यातून उमलले आहे. हा त्यांचा मनाचा मनाशी घडलेला संवाद आहे. स्वत:चे, स्वत;शी, स्वत:पुरते केलेले चिंतन आहे. मराठी रसिक वाचक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करतील.

पुस्तकाचे नांव : भावसंवाद
लेखक  श्री सखाराम यादव पाटील 
प्रकाशन : सविता प्रकाशन, औरंगाबाद
-भिवा रामचंद्र परब 
(पूर्वप्रसिद्धी : लोकसत्ता पुरवणी) 

Thursday, 17 November 2016

विघ्नसंतोषी

विघ्नसंतोषी माणसं सगळीकडेच असतात. कुणाचं काही भलं होताना दिसलं की, यांचा पोटशूळ सुरु होतो आणि मग त्याच्या मागे ते हात धुवून लागतात. एखादा दुःखी असेल तर त्याच्या दुःखावर आणखी कशा डागण्या देता येईल, याचाच ते विचार करीत असतात. खरं म्हणजे एक प्रकारचा विकृत आनंद ते उपभोगत असतात. आमच्या गावातील भास्कर ही एक अशीच वल्ली. सडाफटींग माणूस. भर तरुणपणात बायको वारली. मूल ना बाळ. त्यामुळे तो तसा दु:खी. या दुःखामुळेच त्याला कुणाचं सुख पहावत नाही, असा बहुतेकांचा कयास. थोडीशी शेती होती ती 'खंडाला' दिलेली. खंडाच्या येणाऱ्या उत्पनातून त्याचा उदरनिर्वाह होतो, त्यामुळे गावच्या कुचाळक्या करायला भास्कर मोकळा. त्याचे उद्योग सर्व लोकांना माहीत . पण बोला कशाला? तो आणखी दुसरंच काही उपदव्याप करून लंचाड मागे लावून द्यायचा म्हणून सर्वजण गप्प! पण त्याच्याशी बोलताना प्रत्येकजण आडून आडून त्याला त्याची जाणीव करून देतो, पण ऐकेल तो भास्कर कसला ?
'काय गो सुसल्या, काल आवाटात म्हणे पोलीस येवून गेले?' सुशिलाच्या घरात पाऊल टाकता टाकता भास्करने सहज विचारले.
'असा हो काय भावोजीनू, जसा काय तुमका म्हायेतीच नाय!' सुशिला आपल्या नेहमीच्या अनुनासिक आवाजात म्हणाली.
'माका नाही म्हायेती, मिया तळवड्याक गेल्लय पाव्हण्याकडे. दोन दिवसांनी आजच इलय. काय झाला काय ?' सुशिला समजली याला आपल्या मनातलं सगळं काढून घ्यायचंच.
'अहो आपल्या अंन्त्याची आवस, तिना रानात जावन जाळून घेतला ता...' सुशिला त्या आठवणीने गहिवरले. 'काय त्या बाईचा काळीज तरी..... घरातून चादर घेतलेन, रॉकेल घेतलेन आणि कोंच्या नकळत रानात जावन स्वतःच्या आंगार रॉकेल ओतून जाळून घेतलेन. काय हिमतीची बाई ती! आयुष्यात क्यावा मुंगी चिरडलेन नाय. देवधरम करीत ऱ्हवली.  पोरासाठी पै पै जमा करीत ऱ्हवली आणि शेवटी बेवारश्यासारखी कोणाच्या हाती बोटाक न लागता गेली. पुण्यवान बाई! खराच, पुण्यवान हो बिचारी! खयच्या जन्मात तिना पाप केला म्हणान या जन्मात ता भोगूचा लागला, ता एक परमिसराक म्हायेती.'
'होय गो होय, असा मराण तिच्या दुष्मन्याक पण यवचा न्हय.'
'सगळे म्हणाले ही साधी आत्महत्येची केस आसा, म्हणान आवाटातल्या सगळ्यांनी जमान तिची जी काय चार हाडा शिल्लक ऱ्हवली. ती जाळली. अगदी पोलीस पाटील, सरपंच सगळ्यांका बोलावन आणून. तेव्हा नातेवाईक, भावकी सगळे होते. कोणाची कायेक तकरार नाय व्हती. त्यामुळे पंचनामो करुकच नाय. बरोबर मा ?'
'अगो ह्या सगळं माका म्हायेती आसा.'
'अहो पण कोणीतरी वेंगुर्ल्याक पोलिसांत निनावी तकरार अर्ज केलो. आणि मयताक जितके जण होते, त्या सगळ्यांची चौकशी करुच्यासाठीच काल पोलीस आले.अंत्याच्या झिलाक चारेक हजारोचो चुनो लागलो.'
'अस्सा ! पण मिया म्हणतय, ह्या कोणी कित्याक उपसान काढूक व्हय ?' भास्कर साळसूदपणे म्हणाला तरी त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य काही वेगळंच सांगत होते.
'आता ता तुमका म्हायेती.' सुशिला स्पष्टच म्हणाली, तसा भास्कर चिडला.
'तिया माझ्यार उगाच आळ घेव नको हा, सांगान ठेयताय.'
'मिया खयं काय म्हणतय ? अहो, अख्खो जगमुलूख म्हंता ता मिया सांगतय. काल त्या याळाक आवाटात्सुन फक्त नेमके तुम्हीच नाय व्हत्यास'
'सांगलय मा, मिया कामाक तळावड्याक गेल्लय म्हणान. ता जावं दे, माका याक सांग' भास्करने विषय बदलला.
'तुझ्या सासयेक बरा नाय असा कळला’
'व्हय, सगळीकडे रोगाची साथ पसरली' सुशिला तुटकपणे बोलली.
'म्हातारेक डाक्टरकडे तरी हेल्लय?'
'ख्यका व्हयो डाक्टर आणि फाक्टर ? लाकडा गेली मसनात, आता आमका सतौक जिवंत आसत  झाली. म्हातारेन आता ऐंशी गाठली आसताली. सुनांची त्वांडा बघलेन. नात्रांची त्वांडा बघून झाली. आता पणतू पण येतीत, पण मराचा नाव काढना नाय.'
‘जाव दे गो ! म्हातारेक जगतत तितके दिवस जगाने. काय असा, ही म्हातारी माणसां क्यावा 'गुट' करतीत, तर पुन्हा दिसाची नाय. तसे त्यांचे दिवस भरत आले. आता जागतीत तितके दिवस बोनस...... खय आसा खय ती ?' तीनं घराच्या मागच्या बाजूला खूण केली.
'पाटल्याधाराक?' भास्करने आश्चर्याने विचारले.
'व्हय हो, पाटल्याधाराकच. तिका दोन दोन मिंटानी धुतलो कोण ? आणि कापडा तरी कितकी गुंडाळतलय ? तेव्हा तडेनच ठेयलय. घाण केलेन काय बादलीभर पाणी ओततय. सगळा धुवान जाता' तो त्यांना बघायला उठणार इतक्यात.
' हा हा तडेन जाव नको. तिका उघडी ठेयलय' जायला उठलेला भास्कर खाली बसला. एवढ्यात तीचा नवरा बाळगो रानातून गुरे घेवून आला आणि त्याच्या गप्पाला बसला.
'अगो, तिया ह्या सांगतय, त्या सरस्पतीन आपल्या सासऱ्याक बुधग्याक तर उघड्यावर खळ्यातच ठेयल्यान. मिया गेलाय तर सरस्पती आणि त्येचे दोन्ही जाये त्याका साफ करी व्हती. त्याचा अंगार पाणी ओतल्यानी आणि हाताक घाण लागात म्हणान वाडवणीन त्याच्या अंगावरची घाण काढीत व्हती. बघून तर माका तर कासाचाच झाला गो. जितो प्राणी मगो तो. बरे नाय त्या जीवाचे असे हाल झालेले. माका वाटता सगळीकडे रोगाची साथच  आसा. घाणेरडा गो बाये ह्या शिकपान. अगो तिका आन्न तरी येळावर घालतय घास भर.... काय घाण करता म्हणान उपाशी ठेयतय ?' 
'भावोजीनो, मिया काय तुमका 'तेतला' वाटतय ? सकाळ संध्याकाळ तांदळाची कणी करून त्येची पेज दितय, पण तिका खावक नको त्याका मिया काय करू ? वायच वायच आसान नसान ताप येतां, त्येनी तिचा त्वांडा कडू झाला आसताला.'
'पेजेबरोबर वायच खारातलो आंबा दी आंबटसो, त्वांडाक चव इटली. पुन व्हायचच दि हा. नायतर त्या आमटान ताप आणखी येयत.' यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पात तिघेही रंगून गेली पण अचानक भास्करने पुन्हा पोलिसांचा विषय उरकून काढला. बाळग्याने संशयाची सुई भास्करकडे वळवताच भास्कर हसला.
'अरे तुझ्या आवशीक हगवन लागली म्हणान तुझ्या बायलेन पाटल्याधाराक ठेयलेन. परस्वाधीन ती बिचारी, तुम्ही आन्न देताल्यास, त्याव्हाच ती बिचारी खातली. तिना घाण केली काय तुझी बायल बादलीभर पाणी ओतता. व्हय मगो ? '
'हं हं ' भास्करच्या बोलण्याचा रोख तिच्या ध्यानात आला नाही.
'आता तिका ताप येता, कारण ओलीत ठेयला काय ताप ह्यो येतलोच. आता म्हातारीच ती ! आज उद्या मेली तर, ज्यांका म्हायेती नाय ती म्हणतली, साथीच्या रोगानं मेली. पण ओलेल्यामुळे ताप येय ह्या जसा माका म्हायेती आसा तसाच आणखी कितक्या लोकांका तुम्ही सांगल्यास देवाक म्हायेती. सगळी लोकां माझ्यासारखी नाय...त्यांच्याचपैकी कुणी उद्या पोलिसांकडे तकरार केली तर तुम्ही म्हणताल्यास, ही सगळी भास्करचीच कामा..' हे ऐकताच सुशिला घाईघाईने उठून घरात गेली.
'ओ हडे यया....' घरातून तीन नवऱ्याला हाक मारली आणि भास्कर मनातल्या मनात हसला.
'काय हो, काय बोलता तो ?' घाबरीघुबरी होत तिनं विचारला.
'अगो विघ्नसंतोषी माणूस तो, तिया कित्याक घाबरतय ? त्याका कोणाचा बरा नको. त्याच्या ह्येका ह्येचा त्याका, हेतूतच त्याचो दिवस गेलो. पण तिया जरा आयेची काळजी घे. तिका पाटल्याधारसून हाडून वळयेत ठे. खालते व्हया तर प्लॅस्टिक घाल. पण त्यांका कुडकुडत त्या ओलीत ठेव नको. न जाणो, काय झाला तर त्याचा खापार माझ्या माथ्यार नको. काय आसा,विहिरीर झाकण घालूक येयत. पण समुद्रार खय घालतलय ? तू उगाच त्येची कळ काढलय. जावं दे, दुपारच्या टायमाक इलो. त्यांका वायच पेज वाढ'
सुशिलाने भास्करला 'बरी मेणलेली' फणसाची भाजी आणि पेज वाढली. भरपेट पेज जेवून, तृप्तीचा ढेकर देत भास्करने आपल्या घरची वाट धरली.

-भिवा रामचंद्र परब

निदान आणि उपचार

महाराष्ट्रातील आरोग्य सेवेबाबत जागृत असलेले आणि त्यावर सातत्याने  लिखाण करणारे डॉ. शाम अष्टेकर यांचे चिकित्सा आरोग्यसेवांची हे आरोग्यसेवेबाबतचे पुस्तक.  महाराष्ट्रातील आरोग्यसेवेची आजची स्थिती, त्यातील त्रुटी आणि त्यात करावयाचे आवश्यक ते बदल, सुधारणा म्हणजेच आरोग्याचे निदान आणि त्यावर उपचार असे पुस्तकाचे स्वरूप आहे.

पुस्तकाची विभागणी दोन भागात केलेली असून पहिल्या विभागात आरोग्यसेवा आणि त्यातील समस्या यांचे चार उपभागात विश्लेषण केलेले आहे. तर दुसऱ्या विभागात आरोग्यसेवा सुधारण्यासाठी काय करता येईल यासंबंधी आराखडा दिलेला आहे. हा आराखडा महाराष्ट्राच्या शहरी व ग्रामीण भागात कसा राबविता येईल याची सोप्या शब्दांत दहा प्रकरणात विस्तारपूर्वक माहिती आहे. शहरी आणि ग्रामीण ही दुरी नष्ट करण्यासाठी सर्वसमावेशक अशी आरोग्यसेवा असणे आवश्यक आहे हे ठळकपणे मांडताना त्यांनी प्रशासकीय सुधारणेबरोबरच सामाजिक आरोग्यविमा, सध्या अस्तित्वात आलेले आरोग्य सेवांचा विस्तार, स्वस्त रुग्णालयाचा दर्जा सुधार, वैद्यकीय मनुष्यबळ संख्या आणि त्याची गुणवत्ता, औषधे, आजारांना प्रतिबंध, छोटे कुटुंब व लोकसंख्या, विशेष गटासाठी सेवा आणि वैद्यकीय कायद्याचे पुनर्विलोकन अशा क्षेत्रांची त्यांनी निवड केलेली आहे.

डॉ. अष्टेकर हे वैद्यकीय क्षेत्रातील एक मान्यवर व आरोग्यसेवेबाबतचे अभ्यासक असल्यामुळे गुंतागुंतीच्या या वैद्यकीय क्षेत्राबाबतची त्यांनी केलेली निरीक्षणे आणि जोडीला स्वानुभव यामुळे या पुस्तकात त्यांची मते सुस्पष्ट आहेतच, परंतु त्याचबरोबर आरोग्यसेवेसंबंधी या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांच्या मुलाखती घेऊन त्यांची संक्षिप्त मतेही या पुस्तकात त्यांनी नोंदवलेली आहेत. त्यामुळे सर्वसमावेशक आरोग्यसेवा कशी असावी, तसेच त्याची अंमलबजावणी, व्यवस्थापन याबाबतीतले त्यांनी केलेले मार्गदर्शन अभ्यासकांना मोलाचे ठरलेच. पण संदर्भग्रंथ म्हणूनही हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

पुस्तकाचे नाव : चिकित्सा आरोग्यसेवांची
लेखक : डॉ. शाम अष्टेकर
प्रकाशक        : ग्रंथाली
पृष्ठे      : २६० किंमत : रु २५० /-
-भिवा रामचंद्र परब
(दैनिक सामना रविवार पुरवणीच्या सौजन्याने)


Sunday, 13 November 2016

आकांताचे मृगजळ भाग-५


"इजिप्तची सौंदर्यवती राणी क्लिओपात्रा हिचे निखळ सौंदर्य ज्याच्यामुळे निखरून आले, मानवी शरीराच्या सौंदर्याची आणि आरोग्यदायी जीवनाची निसर्गनिर्मित गुरुकिल्ली ज्याच्यात आहे, त्या गाढविणीच्या दुधाची आणि कुरूप-बेढब गाढवाची उपेक्षा किती काळ चालणार?”
आपल्याला माहीत असलेला, सर्व प्राण्यात ज्याची गणना आपण निर्बुद्धात करतो त्यापैकी एक- घोडा आणि झेब्रा यांच्या जातकुळीतला पण वेगळा प्राणी म्हणजे गाढव. नियतीच्या दुष्टचक्राचा एक भाग बनलेला गाढव आकांत आणि फक्त आकांतच करीत राहिला, तोही आतल्या आत. परमेश्वराने त्याला लाथा झाडण्याची परवानगी दिली खरी पण आपला राग तो सगळ्यावरच लाथा झाडूनच काढू लागला, म्हणूनच असेल कदाचित त्याच्या लाथाळीत ताकद असते. दिसायला कुरूप आणि बेसुऱ्या आवाजाच्या गाढवावर कुणीही उठतो आणि आळशीपणाचा शिक्का मारतो. घरातली आळसावलेली  कुत्री, मांजरे घरचं फुकटचे खाऊन मालकाकडून लाड करून घेतात. पण ते लाड गाढवाच्या नशिबात नाही. मरमर काम करूनही काही खायला न देता त्याच्या पाठीवर मात्र दंडूक्याचे वळ. आजवर त्याला वेठीला धरून त्याच्यावर विनोद आणि बहुतेक खोट्याच असणाऱ्या कथा बक्कळ लिहिल्या  गेल्यात. पण त्यांचे दु:ख़ समजून घेण्यात आपण का कमी पडतो हा मला नेहमी सतावणारा प्रश्न! त्याचाच दूरदूरचा नातेवाईक तो घोडा त्याचे काय लाड करतोय, त्याच्या रुबाबदार, ऐटदारपणावर फिदा होतो आपण.

परवा रस्त्याने जाताना गाढवाचा तांडा चालला होता तो एकमेकांना लत्ताप्रहार करीत. मी अंग चोरून चाललो होतो आणि तसंही एखादा कळप पाहिला, मग तो प्राण्यांचा असो वा माणसांचा होता होईल तेवढं लांब होतो मी. उगाच नसती लचांड का घ्या लावून मागे. कारण कळपाला कसलेही नियम लागू नसतात. झुंडशाहीचे कायदे वेगळे, त्यांचे मानसशास्त्र वेगळेच! कुत्र्यांचा कळप कधी मागे लागला का तुमच्या? एरवी शेपटी हालवीत चालणारा कुत्रा कळपातून आला की कसा अंगावर येतो ते अजमावून पहा एकदा! या भटक्या कुत्र्यांना प्राणीमित्र कसे हाताळतात कुणास ठाऊक? म्हणूनच एखाद्या गाढवाचे लक्ष माझ्याकडे जायला नको म्हणून कडेकडेने चाललो होतो. उकिरड्यावरील मृगजळाच्या मागे धावणाऱ्या या प्राण्याची कीव करावी तेवढी थोडीच! नाहीतरी मालकाने हाकलल्यावर बिचारे जाणार तरी कुठे? तसं पाहिलं तर उकिरडा हे काही त्यांचे ‘लास्ट डेस्टिनेशन’ नाही. परंतु त्यांना दुसरे कोणतेही साधन माणसाने ठेवले नसल्यामुळे उकिरडा हेच त्यांचे ‘लास्ट डेस्टिनेशन’ असं आपण म्हणू शकतो.

मी ही गाढवाची बाजू मांडतोय, गाढवगीता वाचतो खरी पण त्यामुळे ‘गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता’ या म्हणीपेक्षा ‘गाढवापुढे वाचली गीता, वाचणाराच (म्हणजे मी बर का )गाढव होता’ असे कोणीतरी म्हणणारच नाही याच्यावर माझा विश्वास नाही.
                                                                                      
भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतलेल्या एकनाथ महाराजांनी दुष्काळात गाढवाला पाणी पाजले आणि त्याचा जीव वाचविला. त्या पाण्यात काय गुण होता नकळे, एका संताच्या हातचे पाणी होते ते. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व गाढवात शहाणपणा संचारले असावे असा एक शोध लागल्याचे आमच्या एका मित्राने आम्हांला सांगितले आणि एकूण गाढवाबद्द्लचा आमचा आदरभाव आणखी उंचावला. तुम्ही खरं माना अथवा खोटं, ज्या दिवशी गाढवाने भोळ्या कुंभाराला फसवायचे ठरविले त्या दिवशी गाढवाठायी सुद्धा शहाणपणा असतो याची प्रचिती मला आली. मी गाढवाचे चरणस्पर्श करायला वाकलो. मनात भीती होती की गाढव लाथ मारेल. परमेश्वराने प्रत्येक प्राण्याला स्वसंरणार्थ काही ना काही दिलेले आहे. गाढवाचा लत्ताप्रहार हा त्याचा 'हक्क' आहे. पण याच हक्काचा काही प्रमाणात माणूसही भागीदार कसा झाला हे एक कोडेच आहे. गाढवाचे चरणस्पर्श करताना माझ्या मनातले चांगले विचार त्याला समजले तर ठीकच अन्यथा हाणायचा की लाथ कंबरड्यात. पण का कोण जाणे मी त्याला त्याचा भाऊबंद वाटलो असेल म्हणून म्हणा किवा एक तुच्छ मानव आपल्यापुढे झुकतो आहे याचा त्याला सार्थ अभिमान वाटला असेल म्हणून म्हणा त्याने लाथ वगैरे हाणली नाही. परंतु ‘बघा माझ्या पाठीवर सतत ओझी देणारा माणूस माझ्यासमोर वाकलाच की नाही’ अशी मग्रुरी-गुर्मी मला त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसली. मागे एकदा नारदाच्या करामतीने अडलेला हरी असाच गाढवाच्या पायी वाकला होता, तेव्हाचा त्याचा माज आणि आताची गुर्मी तशीच. लाळघोटेपणाची पुटे मनावर चढली नसतील तर नम्रताच माणसाला उच्च स्थानी पोहोचविते ही गोष्ट जेथे माणसाला सांगावी लागते तेथे निर्बुद्ध गाढवाचा काय पाड! पण परमेश्वर तर सगळ्यांचा बाप. त्याने ते बरोबर लक्षात ठेवले आणि त्याच्यातील चांगल्या गुणांना झाकून ठेवून त्याच्या ठायी असलेल्या वाईट गुण जगापुढे ठेवले. त्याच्या वाटेत फक्त दु:खाची पखरण, जागोजागी काटे पेरून ठेवले. 

ही एका गाढवाची गोष्ट तुमच्या आमच्या माहितीतलीच! एक दुकानदार (कदाचित तो कुंभारही असू शकेल) नेहमी गाढवाच्या पाठीवर मिठाची गोणी चढवून आणत असे. नदीच्या पल्याड त्याचे दुकान असल्यामुळे गाढवाला येताना ती गोणी पाण्याला लागणार नाही, याची काळजी घेवूनच यावे लागे. त्यामुळे ते गाढव ओझ्याने आणखी वाकायचे, अगदी मेटाकुटीला यायचे. त्याचवेळी त्याच्या बिनडोक डोक्यात एक आईडिया आली आणि आम्हीही त्याला जवळचे वाटल्यामुळे त्याने ती आमच्या कानात त्यांनी सांगितली. त्याची आईडिया अशी होती की जर नदीतून येताना जर मीठ पाण्यात भिजले तर गोणी हलकी होईल. त्याने पाठीवरील मिठाची गोणी पाण्यात भिजवून तसा प्रयोग केला, मीठ पाण्यात विरघळून गेले. ओझं हलकं झालं. ही बाब मालकाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. एक दिवस त्याने पाठीवरील गोणीत माती भरली आणि गाढवाला पिटाळले. नेहमी पेक्षा जास्त ओझ्याचे गाढवाला काहीच वाटले नाही कारण पाठीवरील ओझे पाण्यात बुडविले की हलके होते हे त्याला सवयीने माहीत होते. ते ओझे घेऊन तो पाण्यात उतरला आणि हे काय? माती भिजून ओझे आणखी जड होत गेले. अरेरे, माझ्यापाठीही अपेक्षांचे ओझे वाढते आहे काय? एकदा बसून विचार करायला हवा.

गाढवाला गुळाची चव नसावी असा एक मतप्रवाह आहे. त्या बिचाऱ्याला चव कळून तरी काय करणार, उकिरड्यावर लोळून, उकिरड्यावरच मिळेल ते खायचे यात सारा जन्म नव्हे, साऱ्या पिढ्या गेल्या. मालकाची फुकटची चाकरी करण्यात त्याची इतिकर्तव्यता. परमेश्वराची लीला अगाध आहे हे म्हटले जाते ते काही वावगं नाही. कुरूप, बेढव असलेल्या गाढवीणीच्या दुधात मात्र मानवी आरोग्याला आणि सौंदर्याला उपकारक घटक असावे ही त्याचीच खेळी! नाही म्हटले तर गाढवीणीचे दुध लहान मुलांना पाजतात, मीही लहानपणी हे दूध प्यालो होतो, असे माझी आई सांगायची. रोगजंतू, रोगसंसर्ग,  जन्मजात अस्थमा असणाऱ्या बालकांसाठी हे दुध चांगले! आणि हे लिहित असताना आणखी असं ही कळलं पार तिकडे सर्बियात गाढवीणीच्या दुधापासून चीज बनवितात आणि ते आजवरचे जगातील सर्वात महागडे चीज आहे. त्या एक किलो चीजची किमत भारतीय चलनानुसार सुमारे दीड लाख रुपये आहे हे वाचल्यावर एखाद्याला गाढवे बाळगायचा छंद जडला तर आश्चर्य वाटायला नको. एवढचं नव्हे तर इजिप्तची राणी सौदर्यवती क्लिओपात्रा हिच्या सौंदर्याचे राज गाढवीणीच्या दुधात होते. ती रोज सातशे गाढवीणीच्या दुधात आंघोळ करायची आणि दररोज प्यायची म्हणे! गाढवीणीच्या दुधावरील गाढ विश्वासाने म्हणा किवा मला अस्थमा झालाच नव्हता म्हणून म्हणा त्यानंतरच्या जाणीवेत दमा केव्हाच झाला नाही. मला एक आश्चर्य वाटते याकडे भारतीय वैद्यकशास्त्राचेअजून लक्ष अजून कसे गेले नाही किंवा एखाद्या भारतीय उद्योगपतीने अजून पदरी गाढवे बाळगून नवा उद्योग धंदा सुरु का केला नाही, हे कळत नाही.

गाढविणीचे दुध तर प्यालो होतोच. त्याची भरपाई करून कशी द्यावी या विचारात होतो तेव्हाच आमच्या प्राध्यापक मित्राने हे सुचविले की गाढवावर काहीतरी लिही. गाढव उकिरड्यावर अरबट चरबट खात असते. त्याला ते पचते. तुही स्वत:ला लेखक समजून पांढऱ्यावर काहीतरी काळे करीत असतोस, तुलाही ते जमते. त्यामुळे त्या अर्थाने तू आणि गाढव दोघे सारखेच! अर्थात त्यामुळेच गाढवाच्या मागे हात धुवून लागलो (कुणा गाढवीणीच्या नव्हे)

कोणी (गाढवाने) गाढवाची मुलाखत घेतली तर ती खरंच बहारदार होईल. आपल्या लत्ताप्रहाराने आणि खिंकाळण्याने मालकालाही जेरीला आणणारे गाढव आपल्या पोतडीतून काय काय काढेल याचा नेम नाही. पळून जाऊ नये, लाथा झाडू नये म्हणून पाठीवर ओझं देऊन पायात दोरी अडकविणाऱ्या मालकाबद्दल त्याला काय वाटत असेल? उकिरडा फुंकायच्या अगोदर रस्त्यावरून चालताना असलेला पालापाचोळा खात आणि रस्ता साफ करीत जातो, त्याचे फळ म्हणून एखादा स्वच्छतेचा पुरस्कार त्याला का मिळू नये? पण त्यापेक्षा एखाद्या गाढविणीची मुलाखत घ्यायला हवी. हिमगारांचा पाऊस असो वा कडक उन्हाळा गाढवापेक्षा खेचर किंवा हिनी अधिक ओझे उचलते म्हणून बिचाऱ्या गाढवावर कोण अत्याचार केले जातात. त्याचा तो आक्रोश कानावर हात ठेवलेल्याना ऐकू जात नसणार. पाळीव हत्तीण माजावर आली की तिला म्हणे जंगलात जाड साखळदंडानी बांधून ठेवतात, असे कुठेतरी वाचले होते. येणारा हत्ती मग तो कुठलाही असो, येतो आणि आपला कंड शमवून जातो. मानवी वेश्येचे, हत्तिणीचे आणि गाढविणीचे दु:ख एकाच मापातले असे मला वाटते. अर्ध्या डझन पोरांना जन्माला घालून नामानिराळा रहाणारा माणसातला बाप हत्तीपेक्षा वेगळा तरी कसा? 

असलेला धंदा सोडून गाढवपालनाचा धंदा करता येईल का? घोडामैदान जवळ आहे.

भाग ६ इथे वाचा 
क्रमशः
-भिवा रामचंद्र परब