पुरस्कार म्हणजे पारितोषिक…पुरस्कार म्हणजे प्रोत्साहन… कामाची पोचपावती, पाठीवर मारलेली कौतुकाची थाप… पुरस्कार म्हणजे पुढे आणखी काही चांगले करून दाखविण्यासाठी दिलेली संधी. परंतू याच गोष्टींचा विसर पडून उदिदष्टहीन पुरस्कारांचे आज सगळीकडे पेव फुटलेले आहे, पुरस्कारांचा अगदी सुळसुळाट झाला आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता दिल्लीच्या राजकारण्यांपासून ते गल्लीच्या दादापर्यत प्रत्येकाला पुरस्कार हवा आहे. दुसऱ्याने केलेले कौतुक, सन्मान कुणाला नको असतो? पण याच मानसिकतेचा फायदा उठवून काही संस्था-व्यक्तीनी या पुरस्काराचा धंदा केलेला आहे. ज्योतिष पासून ते तमाशापर्यंत यांना कोणताही विषय वज्र्य नाही. रोजचे वर्तमानपत्र वाचावे तर कुठे ना कुठे, कुणाला ना कुणाला पुरस्कार जाहीर झालेला असतो आणि त्यांच्या बहुमूल्य कार्याचे (?) जाहीरातीच्या, स्वरूपातील लेखांनी जाहीर कौतुक केलेले असते. शैक्षणिक साहित्यिक, सांस्कॄतिक आणि सामाजिक (आणि राजकीय) क्षेत्रात या पुरस्कारांनी अगदी धुमाकूळ घातलेला आहे. पण यातील खरे किती आणि खोटे किती? खरंच सर्वार्थाने लायक व्यक्तींना हा पुरस्कार मिळतो काही खरे, तर संशोधनाचा विषय ठरावा.
कोणी मानो किंवा न मानो, शासकीय पातळीवरील कोणताही पुरस्कार हा श्रेष्ठ असतो, कारण त्याला शासनमान्यतेची पर्यायाने
समाजाची मोहोर लागलेली असते. काही खासगी नामवंत
संस्थाकडून दिलेले पुरस्कार ही त्याच तोलामोलाचे असतात. पण एकाद-दुसरा अपवाद वगळता हल्ली बहुतेक सर्वच पुरस्कार
देणाऱ्या संस्था, पुरस्काराच्या पध्दती आाणि त्यांची कार्यप्रणाली, पुरस्कारित व्यक्ती
याबाबत लोकांकडून टीका होवू लागली आहे. गावपातळीपासून ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार देणाऱ्या अनेक संस्था उदयास आल्या आहेत. पण प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या संस्था अगदी थोडयाच. बाकी संस्थाचा केवळ पैसा कमविणे हाच आहे. एखादया संस्थेची
शासनाकडून नोंदणी करून घेवून त्याद्रवारे वर्तमानपत्रात जाहीरात देवून अर्ज मागवायचे, त्याचबरोबर अर्जाची
फी, कार्यक्रमाची फी
म्हणून एक ठराविक रक्कम गोळा करावयाची आणि अर्ज आलेल्या सर्वाना पुरस्काराची फक्त
प्रमाणपत्रे वाटायची| केव्हा केव्हा आपण ‘आमच्या संस्थेस अमुक एक देणगी द्या, आम्ही तुम्हांला पुरस्कार देतो’ किवा पुरस्काराची
रक्कम जेव्हा काही हजाराच्या घरात असते, तेव्हा ती रक्कम संस्थेला परत
दान करण्याच्या बोलीवरच पुरस्कार द्यायचा, असा प्रकार चालतो. दुसऱ्या भाषेत बोलायचे झाल्यास
पुरस्कार विकायचे-विकत घ्यायचे. पुरस्काराचे प्रमाणपत्र घेणारा स्वत:ला धन्य धन्य समजतो| गल्लीबोळातली कुठलीही व्यक्ती अशा पुरस्कारासाठी अर्ज भरते आणि
असे प्रमाणपत्र मिळवून आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत याची जाहीरात करीत सुटते. या मिळणाऱ्या पुरस्काराची नांवे ही मोठमोठी
असतात. आदर्श समाजसेवक, लोकनायक, आदर्श लोकनेता, आदर्श शिक्षक, शिक्षणमहर्षी, समाजरत्न, संगीतरत्न, रत्नशिरोमणी, कलारत्न, कला शिरोमणी, समाजभूषण, अशा भारदस्त नांवानी
लोकांची दिशाभूल होते. काही वेळा शासकीय संस्थांशी जवळीक असलेल्या नांवातील साधर्म्यामुळे लोक फसतात.
पुरस्काराच्या
बाबतीत सामाजिक आणि सांस्कॄतिक क्षेत्राबाबत तर बोलायलाच नको अशी स्थिती, यांनी त्याचे कौतुक करावे, त्यांनी याचे कौतुक करावे असा
सगळा आपस का मामला! मात्र पुरस्काराचे स्तोम सध्या शैक्षणिक क्षेत्रात जास्त माजले आहे. कारण शाळामधून अशा संस्थाना घावूक गिऱ्हाईके मिळतात. सरसकट सर्व विद्याथ्र्याकरिता
एखादी क्रीडा चित्रकला वा तत्सम स्पर्धा घ्यायची, वर्गणी गोळा करायची आणि त्या क्षेत्रातील सर्वोच्य नावांनी पुरस्कार विद्याथ्र्याना, शिक्षकांना वाटून टाकायचे. जे पुरस्कार मिळविण्यासाठी उभी
हयात खर्ची पडते, ते पुरस्कार असे कवडीमोलाने मिळाल्यावर विद्याथ्र्याना
त्या मुळ पुरस्काराची मातब्बरी ती काय
रहाणार? याचा विचार कोणी करीत नाही. क्वचित प्रंसगी पंधरा-वीस रूपयाची ‘गोल्डमेडल’ ही घावूक पध्दतीने सर्व विद्यार्थ्यांना द्यायची म्हणजे सगळे खुष… गल्लाही व्यवस्थित जमतो. या पुरस्काराचे मोल काय? असा प्रश्न कोणीही विचारत नाही. कारण भाग घेणाऱ्या शाळेतील प्रत्येक संबंधित घटकाला म्हणजेच मुख्याध्यापक, शिक्षकांना ‘आचार्य पुरस्कार’, ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ आणि गेला बाजार ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार चे प्रमाणपत्र दिले की एकदाचे गंगेत घोडे न्हाले. दरवर्षी एकेकाला असे पुरस्कारातून बुडवून काढले की
सगळेच ‘आदर्श शिक्षक’ आणि सगळेच ‘आचार्य‘, ‘द्रोणाचार्य’
लायकी
नसताना दरवर्षी आलटून पालटून असे पुरस्कार मिळविणारे आणि स्वत:ची टिमकी वाजविणारे अनेक महाभाग आपल्या सभोवताली सापडतील. कारण पुरस्कार कसाही असला तरी शेवटी पुरस्काराचे लिखित प्रमाणपत्र
हा पुरस्कारित व्यक्तीसाठी मौल्यवान ठेवाच असतो. पुढच्या पुरस्काराची ती पहिली पायरी असते| कारण या एका पुरस्कारामुळे किंवा त्याच्या नोंदीमुळे त्याला पुढचा पुरस्कार मिळणार असतो| “घरात नाही दाणा
आणि मला बाजीराव म्हणा” या उक्तीप्रमाणे पुरस्कारांचा हव्यास वाढत चाललेला आहे. कर्तव्यापेक्षा दिखावूपणा, पुढे पुढे करण्याची वॄत्ती वाढीला लागल्याचा हा दॄष्य
परिणाम |
ध्येयवेडी माणसे सोडली तर पुरस्कार मिळविण्यासाठी वेगळे काही करावे लागते
यावर माझा विश्वास नाही. आपल्याला करण्यासारखे आहे तेच
समर्पण भावनेने केले की त्याची दखल घेणे, समाजाला क्रमप्राप्त ठरते. अर्थात हे ही खरे की, अशा व्यक्तींना
पुरस्काराची गरज भासत नाही. कुणासाठी काही केले, त्यातच त्यांना
समाधान, तोच त्यांचा पुरस्कार… आणि समजा कुणा एखादया सच्च्या, प्रामाणिक व्यक्तीला जरी पुरस्कार
मिळावा, असे वाटले तरी ते तेवढे शक्य नाही. खासगी सोडा पण शासनाचे पुरस्कार
मिळविण्यासाठी नुसते तुमचे कर्तृत्व असून उपयोगी नाही. ते सादर करण्याची हातोटी लागते. तुम्ही मिळविलेल्या किंवा तुम्ही लिहून घेतलेल्या प्रमाणपत्रांनी तुमची फार्इल भरगच्च भरली
असेल तर तुमचे नगण्य कर्तृत्वही पुरस्कार मिळविण्यासाठी मोलाचे ठरते. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे झाले तर तुमच्या कर्तृत्वापेक्षा तुमची फार्इल केवढी
मोठी आहे, कशी सजवली आहे, यावर पुरस्कार अवलंबून आहे. त्या शिवाय तुमची उठबस कुठे आहे? यावरही पुरस्कार मिळणे न मिळणे अवलंबून
आहे. पण त्यामुळे खरोखरच कर्तृत्ववान माणसे पुरस्कारापासून
वंचित आहेत आणि नको त्या व्यक्ती पुरस्कार
घेवून जातात|
लायक, गुणवान, कर्तॄत्ववान व्यक्तींना
पुरस्कार मिळायला हवे असतील, त्याच्या गुणांचे चीज व्हायला
हवे असे वाटत असेल तर पुरस्कार देण्याच्या प्रचलित पध्दतीत सुधारणा व्हायला हव्यात. याबाबत गेल्या दोन वर्षापूवी महानगर पालिकेने महापौर
पुरस्कार देण्याबाबतची आपली पुर्वीची पध्दत बदलली. सध्या इच्छुक उमेदवाराच्या कार्याचे, कर्तॄत्वाचे प्रत्यक्ष अवलोकन
करून उमेदवाराचे मुल्यमापन करणारी अशी सर्वसमावेशक नवीन पध्दत अंमलात आणून त्यादवारे
महानगरपालिकेचे शिक्षकांसाठीचे महापौर पुरस्कार जाहीर केले जात आहे,ही पध्दत पुर्णत: निर्दोष आहे. असे नाही, पण त्यादॄष्टीने मुंबर्इ महानगरपालिकेने
उचललेले पावूल स्वागतार्ह आहे.
अशीच पध्दत शासन देत असलेल्या आपल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वा अन्य
पुरस्काराबाबत अंमलात आणील तर बरे होर्इल|
साहित्यिक
क्षेत्रातही थोडयाफार फार फरकाने हीच स्थिती आहे. ‘तुमच्या कविता,लेख स्पर्धेसाठी पाठवा आणि सोबत ठराविक अंकाची ठराविक
किमंत’ अशा जाहीराती किंवा पत्रक हातात आले की खुशाल समजावे की, आपली कविता कविता ही कशीही असली तरी छापून
येवून कुठल्यातरी कवीच्या नांवाने पुरस्काराचे प्रमाणपत्र घरी येणार.
पुरस्कार
मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या लटपटी, खटपटी हा एका स्वतंत्र विषयाचा लेख ठरावा, पण सगळीकडेच आपले कर्तृत्व सांगून, आपलेच कौतुक आपल्या
तोंडाने करून, फार्इल सादर करून आज पुरस्कार मिळवावे लागतात. ही वस्तुस्थिती आहे. पण हे बदलायला हवे, त्रयस्थ:पणे विचार
करून एखादया व्यक्तीचा गौरव होणे हा खरा पुरस्कार आहे असे जेव्हा पुरस्कार देणाऱ्याला वाटेल तेव्हा पुरस्कारासाठी
मिळालेले साधे प्रमाणपत्र मौल्यवान ठरेल, यात शंका नाही.
-भिवा परब